बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा (Belgaum Municipal Corporation Election) निकाल आज घोषित झाला. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपनं 35 काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे 36 सदस्य होते.


Belgaum Municipal Election Results LIVE: बेळगाव महापालिका निवडणूक निकाल, पाहा लाईव्ह अपडेट्स


58 जागेवर निवडणूक, 33 मॅजिक फिगर


58 जागेवर निवडणूक असली तरी बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे 2 खासदार, 2 आमदार आहेत. तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी 33 या मॅजिक फिगरची गरज असते. भाजपनं 35 जागा जिंकत निर्विवादपणे सत्ता प्राप्त केली आहे. 


एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं.  मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती, मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाहीत.    बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचा समावेश होता. 


अपवाद वगळता मतमोजणी शांततेत
तुरळक अपवाद वगळता मतमोजणी शांततेत पार पडली. गर्दी केल्यानं एकदा पोलिसांची सौम्य लाठीचार्ज केला. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. शहरात मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.  


बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या गेल्या. भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले होते. यात भाजपला 35 जागांवर तर कॉंग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला. मात्र गेल्यावेळी सत्तेत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला.