श्रीनगर : बडगाम हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणी चौकशीत एखादा अधिकारी दोषी आढळल्यास वायूदलाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरी केवळ दोषींना शिक्षा सुनावणार नाही, तर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याबाबत उपाययोजनाही सुचवणार आहे. स्टन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये चूक झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी श्रीनगर एअरबेसमधील वायूसेनेच्या अधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली आहे.


भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. त्याचवेळी श्रीगरजवळ बडगाममध्ये भारतीय वायूसेनेचं एमआय-17 हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरच्या दोन पायलटसह सहा मेम्बर्स शहीद झाले होते. एका नागरिकाचाही यामध्ये मृत्यू झाला होता.


वायूसेनेनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी विमानांही भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती, त्यावेळी एमआय-17 हे भारतीय हेलिकॉप्टर हवेत उडत होतं. मात्र काही वेळातच हेलिकॉप्टर बडगामजवळ क्रॅश झालं. प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार हेलिकॉप्टर क्रॅश होण्याआधी स्फोटाचा आवाज झाला होता, त्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या एअरबेसवरुन एमआय-17 हेलिकॉप्टर उडालं त्यावेळी त्याचं आयएफएफ ट्रान्सपोंडर म्हणजे 'आयडेन्टिफिकेशन ऑफ फ्रेंड ऑर फो' सुरु नव्हतं. त्यामुळे हेलिकॉप्टर भारतीय आहे की पाकिस्तानी हे श्रीनगर एअरबेसवरील वेपन टर्मिनलला समजलं नाही. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर पाकिस्तानचं असल्याचं समजून वायूसेनेच्या वेपन टर्मिनलने या हेलिकॉप्टरवर मिसाईल सोडलं आणि हेलिकॉप्टर क्रॅश झालं.


श्रीनगर एअरबेसवरील अधिकाऱ्याची बदलीही यासाठी करण्यात आली आहे, कारण युद्धसदृष परिस्थिती असतानाही हेलिकॉप्टरचं आयएफएफ ऑन केलं गेलं नव्हतं. तसेच हेलिकॉप्टरने उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच एटीसीने हेलिकॉप्टरला परतण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही एअरबेस वेपन टर्मिनलने शत्रूचं हेलिकॉप्टर समजून त्यावर हल्ला केला. म्हणजे एटीसी आणि वेपन टर्मिनल यांच्या युद्ध सदृष परिस्थितीतही समन्वय दिसलं नाही. याच मोठ्या चुकीमुळे वायूसेनेचे चार अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.


स्टन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरकडे दुर्लक्ष केल्यामुळेच एवढी मोठी दुर्घटना झाली आहे. त्यामुळे यामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्या कडक कारवाई केली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत कोर्ट मार्शलची कारवाई होऊ शकते.


नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद


बडगाम हेलिकॉप्टर अपघातात एअरफोर्समधील नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले होते. या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 2 वैमानिकांसह 6 जवान शहीद झाले होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे.