बालाकोट : आतापर्यंत भारतीय वायूसेनेनं केलेल्या एअर स्ट्राईकला खोटं ठरवणाऱ्या पाकिस्तानला तोंड लपवण्याची जागा राहिलेली नाही. याचं कारण पाकिस्तानच्या ज्या बालाकोटमध्ये भारतीय वायूसेनेनं एअर स्ट्राईककरून 250 अतिरेक्यांना ठार केलं, त्या अतिरेक्यांचे मृतदेह अजूनही पडून आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


याशिवाय घटनास्थळी पाकिस्तानी मीडियाला जाण्यासही पाकिस्तानी सेनेनं बंदी घातली आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला असा सवाल पाकिस्तानला त्यांचीच मीडिया विचारत आहे. पितळ उघडं पडेल या भीतीनं आतापर्यंत पाकिस्तान सेना झाकाझाकी करण्याचा प्रयत्न करत होती.

भारतीय वायुसेनेने केंद्र सरकारकडे पुरावे म्हणून 12 छायाचित्रे आणि अहवाल सुपूर्द केला : सूत्र
बालाकोट येथील एअर स्ट्राईकबाबत पुरावे म्हणून भारतीय वायुसेनेने केंद्र सरकारला रडार आणि उपग्रहांद्वारे घेतलेली छायाचित्रे दिली आहेत. संरक्षण विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फोटोंमध्ये बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण केंद्र उध्वस्त झाले असल्याचे पुरावे आहेत.

छायाचित्रांसह वायुसेने सरकारकडे या हल्ल्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, वायु सेनेने बंकर बस्टिंग मिसाईल्सचा वापर केला होता. या हल्ल्यात पूर्ण इमारत उद्ध्वस्त होईलच असं सांगता येणार नाही. परंतु भारताने संपूर्ण क्षमतेनिशी हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच आता वायु सेनेने केंद्र सरकारकडे पुरावे सादर केले असल्याची माहिती मिळाली आहे. आता हे पुरावे सरकार लोकांसमोर कधी मांडणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दरम्यान, भारताने ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, तिथल्या इमारती जशाच्या तशा आहेत, असा दावा काही आंतराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे. त्यामुळे सरकार आणि आंतरराष्ट्रीय मीडिया या दोघांनी दोन वेगवेगळे दावे केल्यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे.