नवी दिल्ली : टॅक्स रिटर्न्स फाईल न करणाऱ्यांभोवती आयकर विभागानं दोर आवळल्यानंतर, तब्बल 26 हजार 500 कोटी रुपयांची वसुली झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी अरुण जेटली यांनी सदनात ही माहिती दिली.

मोठ्या रकमेचे व्यवहार करुनही, वर्षानुवर्ष आयकर न भरणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी सरकरानं टीडीएस आणि टीसीएसची मदत घेतली होती. यापुढे अशा पद्धतीनं कर भरणं टाळणाऱ्यांना सूट मिळू नये, यासाठी 2 लाखांवरील व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आल्याचंही जेटलींनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्यांवर सरकारची करडी नजर ठेवली होती. अशा जवळपास कोटी 7 लाख लोकांना आयकर विभागानं नजर ठेवून त्यांच्याकडून 26 हजार कोटी वसूल केले आहेत.

'पुढील आर्थिक वर्षात महसुलीतूट समाधानकारक'

दुसरीकडे पुढील आर्थिक वर्षात महसुलीतूट ही समाधानकारक राहण्याची अपेक्षा अर्थमंत्री अरुण जेटलींनी आज व्यक्त केली. शिवाय, कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीवर बोलतानाही याबाबतच्या सर्व शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अरुण जेटलींची आज रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

"सध्या तेलबाजारातील कच्चा तेलाच्या किमतीवरुन जे तर्क-वितर्क लढवले जात आहेत, त्याचं आकलन करण्याची गरज नाही.कारण, गेल्या तीन दिवसात कच्च्या तेलाचे दर पाहिले, तर त्याच्या विरुद्ध स्थिती आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर, त्यात झपाट्याने घसरण होत आहे," असे त्यांनी यावेळी सांगितलं.