चेन्नई : दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूमधील मित्रपक्ष, एनडीए आघाडीतील घटक पक्ष  AIADMK ने  भाजपसोबत युती तोडली असल्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत अण्णाद्रमुकने अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडण्याच्या आणि भाजपसोबतची आघाडी मोडीत काढत असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. 


AIADMK नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाचे उप समन्वयक के पी मुनुसामी यांनी म्हटले की, आजपासून अण्णाद्रमुकने भाजप आणि एनडीए सोबतचे सगळे संबंध तोडत आहोत. भाजपचे राज्य नेतृत्व मागील वर्षभरापासून आमचे पक्षाचे महासचिव ईपीएस पलानीस्वामी, इतर नेत्यांसह कार्यकर्त्यांवरदेखील अनावश्यक टीका-टिप्पणी करत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत भाजपसोबत युती तोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. 


अण्णाद्रमुकने युती तोडत असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. 






तिसऱ्या आघाडीचा डाव मांडला जाणार ?


वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अण्णाद्रमुकने म्हटले की, आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक एका वेगळ्या आघाडीचे नेतृत्व करणार आहे. सध्या भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आहे. इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. त्यात डाव्यांसह तृणमूल काँग्रेस, आप सारख्या पक्षांचा समावेश आहे. तर, एनडीएमध्ये विविध प्रादेशिक आणि लहान पक्षांसह 30 हून अधिक पक्ष आहेत. 


देशातील अनेक पक्ष हे एनडीए अथवा इंडिया आघाडीचे घटक नाहीत. यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर यांचा भारत राष्ट्र समिती, ओवैसी यांचा एमआयएम, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष आहेत. 


युती का तुटली? 


द्रविड आयकॉन अण्णादुराई यांना हिंदू धर्माबद्दल वक्तव्य केल्यामुळे 1956 मध्ये माफी मागावी लागली होती असं विधान तिथल्या भाजपच्या अध्यक्षांनी केलं होतं त्यावरून AIDMK चा संताप टोकाला गेला आणि त्यानंतर त्याची परिणीती संबंध तोडण्यात झाली आहे. सनातन धर्म मुद्द्याचं प्रतिबिंब दक्षिणेत पूर्णतः वेगळं आणि उत्तरेत पूर्णतः वेगळं आहे. 


निवडणुकीत आघाडीची कामगिरी कशी राहिली? 


2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने AIDMK सोबत युती केली होती पण ती अयशस्वी ठरली. 2014 मध्ये ( त्यावेळी जयललिता हयात होत्या)  37 जागा जिंकणाऱ्या AIDMK ला 2019 मध्ये केवळ एका जागेवर यश आलं तमिळनाडूतल्या 31 जागा DMK- काँग्रेस युतीने जिंकल्या DMK ने 23  काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीच्या वेळी भाजप-अण्णाद्रमुक या दोघांना युतीचा विशेष लाभ झाला नाही.  2014 ला भाजपने तामिळनाडूत एका जागेवर खातं खोललं होतं. पण, 2019 ला ती एक जागा पण राखता आली नाही.  आता भाजपची साथ सोडल्यामुळे AIDMK चा मतदार पुन्हा त्यांच्यासोबत येईल का? आणि DMK-काँग्रेस युतीच्या तामिळनाडूतल्या काही जागा कमी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.