99.3 टक्के बाद नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत, RBI चा अहवाल
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2018 05:54 PM (IST)
99.3 टक्के बाद नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्यामुळे नोटाबंदी फसल्याच्या चर्चा आहेत.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटा बँकेत परत आल्यामुळे नोटाबंदी फसल्याच्या चर्चा आहेत. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 41 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपये किमतीच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा परत बँकेत आल्या आहेत. केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नाहीत. ही आकडेवारी अत्यल्प असल्यामुळे नोटाबंदीचा काहीच फायदा नसल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानंतर देशभरात अभूतपूर्व चलनटंचाई होऊन जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बँकेत परत येणार असा दावा करण्यात येत होता. मात्र तब्बल 99.30 टक्के नोटा परत बँकेत आल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.