5th September In History: भारतात आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्म झाला आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ. राधाकृष्णन हे भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक, प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि महान तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ.राधाकृष्णन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न'ही मिळाला आहे. 


आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या इतर महत्त्वाच्या घटना पुढीलप्रमाणे, 


1763 : मीर कासिमला राजमहालाजवळील उदयनाला येथे ब्रिटिश सैन्याविरुद्धच्या युद्धात पराभव स्वीकारावा लागला.


1888 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन (Dr. Radhakrishnan Birthday)


भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्म 5 सप्टेंबर 1988 रोजी आंध्र प्रदेशातील चितुर जिल्ह्यातील तिरूपाणी या गावी झाला. त्यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्ष शै‍क्षणिक क्षेत्रात काम केलं. तत्वज्ञानाचे ते प्राध्यापक होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत 5 सप्टेंबर हा दिवस देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.


1914: ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम आणि रशिया यांच्यात लंडन करार.


1918 : उद्योगपती रतनजी जमशेदजी टाटा यांचे निधन


सर रतनजी टाटा (Ratanji Tata) हे भारतातील सुप्रसिद्ध पारसी उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे पुत्र होते. भारतातील टाटा समूहाच्या वाढीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.रतनजी टाटा यांचा जन्म 20 जानेवारी 1871 रोजी मुंबईत झाला. सेंट झेवियर्स कॉलेज, बॉम्बे येथे शिकून त्यांनी उद्योगविश्वात पदार्पण केलं. 1904 मध्ये त्यांचे वडील मरण पावले तेव्हा त्यांना आणि त्यांचे भाऊ सर दोराबजी जमशेदजी टाटा यांना वारसाहक्काने प्रचंड वैभव आणि संपत्ती मिळाली. टाटा अँड कंपनीचे भागीदार असण्याव्यतिरिक्त, ते इंडियन हॉस्टेल्स कंपनी लिमिटेड, टाटा लिमिटेड, लंडन टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स साकची, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड, इंडियाचे संचालक होते.


वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचा त्यांनी औद्योगिक विकासाबरोबरच समाजसेवेच्या कामात वापर केला. 1912 मध्ये, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सामाजिक विज्ञान आणि प्रशासन विभागाची स्थापना केली. त्याच वर्षी, गरीब विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी लंडन विद्यापीठात रतन टाटा फंड देखील स्थापन करण्यात आला. त्यांच्या नावाने चॅरिटी फंडही स्थापन करण्यात आला. 5 सप्टेंबर 1918 रोजी कॉर्नवॉल येथे त्यांचे निधन झाले. 


1986: दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या भारतीय विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत शहीद


नीरजा भनोत (Neerja Bhanot) ही मुंबईतील पॅन अमेरिकन एअरलाईन्ससाठी (Pan Am Flight 73) फ्लाइट अटेंडंट होती. 5 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या PAN AM-73 फ्लाईटचे पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी (Palestinian Terrorists ) कराचीत अपहरण केले आणि सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले. त्या विमानात नीरजाची नियुक्ती करण्यात आली होती आणि तिच्या समयसूचकतेमुळे तीन क्रू मेंबर्स विमानाच्या कॉकपिटमधून ताबडतोब सुखरूप बाहेर पडू शकले. पण इस्त्रायल आणि अमेरिकन सरकारसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर जेव्हा 17 तासांनंतर अतिरेक्यांनी प्रवाशांना ठार मारण्यास आणि विमानात स्फोटके पेरण्यास सुरुवात केली, तेव्हा नीरजाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांना वाचवले. आपत्कालीन दरवाजा उघडल्यानंतर नीरजाने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. यामध्ये नीरजाला दहशतवाद्यांनी गोळी मारली आणि तिची हत्या केली. पण नीरजाने दाखवलेल्या शौर्यामुळे अमेरिकन सरकारनेही तिचा मोठा गौरव केला. 


निरजा भनोत हिचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्राने सन्मान करण्यात आला. पाकिस्तान सरकार आणि अमेरिकन सरकारनेही तिला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले. 2016 मध्ये त्याच्या कथेवर आधारित एक चित्रपटही बनवण्यात आला होता, ज्यामध्ये सोनम कपूरने त्याची भूमिका साकारली होती.


1991: नेल्सन मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.


1997 : मदर टेरेसा यांचे निधन 


अल्बेनियात जन्मलेल्या मदर टेरेसा (Mother Teresa) यांना त्यांनी  भारतातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली. मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मदर टेरेसा यांनी ही संस्था कोलकात्यात स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. पोप जॉन पॉल द्वितीय यांनी मदर तेरेसा यांना संत म्हणून घोषित केले. जे त्यांच्या संत बनण्याच्या प्रवासातील पहिले पाऊल होते. मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. कुष्ठरोगी आणि अनाथांची सेवा करणाऱ्या मदर टेरेसा यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना 25 जानेवारी 1980 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 5 सप्टेंबर 1997 रोजी कोलकात्यात त्यांचे निधन झाले. 


ही बातमी वाचा: