PM Narendra Modi : भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा असून, गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरु शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केलं. भारताच्या दुग्ध विकास (Dairy Development) क्षेत्राचे खरे नेतृत्व  महिलाच करत आहेत. कारण दुग्ध विकासात महिलांचे 70 टक्के प्रतिनिधीत्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. यात वाढ होऊन आता ते 210 दशलक्ष टन झाले आहे. म्हणजेच देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्लीजवळ ग्रेटर नोएडा इथे आंतरराष्ट्रीय डेयरी फेडरेशनच्या जागतिक दुग्ध व्यवसाय परिषदेचे उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.


भारताच्या दुग्धव्यवसायाचं वैशिष्ट्य हे 'बहु-उत्पादना'पेक्षाही 'बहुसंख्यांनी' केलेली उत्पादने


दुग्ध व्यवसाय क्षेत्राची खरी क्षमता केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची नाही, तर जगभरातील लोकांच्या उपजीविकेचं साधन असल्याचे मोदी म्हणाले. दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी संबंधित जगभरातील सर्व मान्यवर आणि महत्वाच्या व्यक्ती, या परिषदेसाठी एकत्र जमल्या आहेत. याचा मला अतिशय आनंद होत आहे. भारताच्या या क्षेत्रातील कल्पना आणि अनुभव जगासमोर मांडण्याची, त्यांच्या कल्पना स्वीकारण्यासाठी हे एक अत्यंत महत्वाचे माध्यम ठरणार असल्याचे मोदी म्हणाले. भारताच्या सांस्कृतिक पटलावर पशुधनाचे आणि दुधाशी संबंधित व्यवसायांचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केलं. यामुळेच भारताचे दुग्ध व्यवसाय क्षेत्र अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. जगातील इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात, हा व्यवसाय चालवणारा मोठा वर्ग, छोट्या शेतकऱ्यांचा आहे. जे जगात इतरत्र कुठे दिसत नाही. भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे वैशिष्ट्य असे, की ते ‘बहु-उत्पादने’ पेक्षाही ‘बहुसंख्यांनी तयार केलेली उत्पादने” असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध संकलित 


भारतात दुग्ध व्यवसायात सहकार क्षेत्राचे जे भव्य जाळे पसरले आहे, ते तुम्हाला इतर कोणत्याही देशांत बघता येणार नाही.  हे दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थेचे लोक, दोन लाखांपेक्षा अधिक गावातील 2 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध संकलित करतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. या व्यवसायात कोणीही मध्यस्थ नसतो आणि त्यामुळं संपूर्ण प्रक्रियेतील 70 टक्क्यांपेक्षा अधिक निधी थेट शेतकऱ्यांकडे जातो असेही पंतप्रधान म्हणाले. देशात अनेक प्रकारच्या विपरीत परिस्थितीचा सामना करु शकणाऱ्या देशी जाती आहेत. यासाठी त्यांनी गुजरातच्या कच्छ भागातील बन्नी या म्हशींच्या अत्यंत धडधाकट जातीचे उदाहरण दिले. त्यांनी यावेळी बोलताना, म्हशींच्या मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादीचा उल्लेख केला. निळी रावी आणि पंढरपुरी या इतर जातींबद्दल तसेच गीर, सहिवाल, राठी, कांकरेज, थरपार्कर आणि हरियाणा या गाईंच्या जातींचा देखील त्यांनी उल्लेख केला.


दूध उत्पादनात 44 टक्क्यांची वाढ


भारताच्या दुग्ध विकास क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व हे 70 टक्के आहे. याकडं त्यांनी लक्ष वेधलं. महिलाच भारतीय दुग्धविकास क्षेत्राचे खरे नेतृत्व करत आहेत. एवढेच नव्हे तर दूध उत्पादक सहकारी संस्थांमधील सदस्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य महिलाच आहेत. साडेआठ लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असणारे हे क्षेत्र गहू आणि तांदूळ यांच्या एकत्रित मूल्यापेक्षा अधिक मूल्याचे आहे. भारतातील महिलाशक्तीने एवढे मोठे क्षेत्र संचालित केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. यात वाढ होऊन आता ते 210 दशलक्ष टन झाले आहे. म्हणजेच देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जागतिक स्तरावर दूध निर्मितीमध्ये दरवर्षी 2 टक्के दरानं वाढ होत आहे. त्या तुलनेत भारतात दूध उत्पादनात 6 टक्के विकास दराने वाढ होत आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला.


महत्त्वाच्या बातम्या: