अहमदाबाद : नरोदा पाटिया दंगलीत गुजरात उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने माजी मंत्री माया कोडनानी यांना निर्दोष ठरवत सुटका केली. तर बजरंग दलाचे माजी  नेते बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.


याशिवाय उच्च न्यायालायने हरीश छारा आणि सुरेश लांगडालाही दोषी ठरवलं आहे. अहमदाबादच्या विशेष एसआयटी कोर्टाने बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

काय होती नरोदा पाटिया दंगल?

26 फेब्रुवारी, 2002 रोजी साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्टेशनवर पोहोचली असता, अयोध्याहून परतलेले 57 कारसेवक असलेल्या बोगीत आग लावली होती. यानंतर संपूर्ण गुजरातमधील वातावरण बिघडलं. गुजरातमध्ये दंगली भडकल्या. याच साखळीत 28 फेब्रुवारी, 2002 रोजी अहमदाबादच्या नरोदा पाटियामध्ये दंगल भडकली, ज्यात 97 लोकांची हत्या करण्यात आली होती.

नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणात तत्कालिन मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि नरोदाच्या आमदार माया कोडनानी, बजरंग दलचे माजी नेते बाबू बजरंगी, स्थानिक भाजप नेते बिपिन पांचाळ, किशन कोरानी, अशोक सिंधी आणि वकील राजू चौमाल यांच्यासह 61 आरोपी बनवण्यात आलं होतं.

नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणाची कारवाई ऑगस्ट 2009 मध्ये सुरु झाली होती. यात 62 आरोपींविरोधात आरोप दाखल करण्यात आले. यात सुनावणी दरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

त्यावेळी माया कोडनानी माझ्यासोबत विधानसभेत होत्या, शाहांची कोर्टात साक्ष

कोणाला किती शिक्षा?

या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती हर्षा देवानी आणि न्यायमूर्ती ए. एस. सुपेहिया यांच्या खंडपीठाने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्णय राखून ठेवला होता.

ऑगस्ट 2012 मध्ये विशेष एसआयटी कोर्टाने माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या माया कोडनानी यांच्यासह 32 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोडनानी यांना 28 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तर बाबू बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. माया कोडनानी नरोदा हत्याकांडाची सूत्रधार असल्याची टिप्पणी विशेष एसआयटी न्यायालयाने केली होती.

तर इतर सात जणांना 21 वर्षांची आणि उर्वरित 23 जणांना 14 वर्षांची शिक्षा दिली. पुराव्यांअभावी न्यायालयाने 29 जणांची निर्दोष मुक्तता केली.

न्यायाधीशांकडून नरोदा पाटियाची पाहणी

यानंतर कोडनानी आणि बाबू बजरंगीसह सर्व दोषींनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर एसआयटीनेही या निर्णयाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान नरोदा पाटियाची पाहणीही केली होती, जिथे 97 लोकांची हत्या झाली होती.

माया कोडनानी यांच्यावर चिथवल्याचा आरोप 

गुजरातमध्ये 2007 ते 2009 दरम्यान महिला आणि बालविकास राज्यमंत्री असलेल्या माया कोडनानी यांना नरोदा पाटिया दंगली प्रकरणात अटकेनंतर राजीनामा द्यावा लागला होता. दंगलीच्या वेळी कोडनानी केवळ उपस्थितच नव्हत्या तर त्या लोकांना भडकवतही होत्या, असा जबाब साक्षीदारांनी नोंदवला होता. कोडनानी यांनी आपल्या भाषणातून मुस्लीम वस्त्यांवर हल्ला करण्यासाठी चिथवलं होतं, असा आरोप त्यांच्यावर होता.

राजकारणापासून माया कोडनानी दूर

गुजरातमधील नरोदा-पाटिया हत्याकांडप्रकरणात न्यायालयाने 31 जणांना शिक्षा सुनावली. व्यवसायाने स्त्री रोग तज्ज्ञ असलेल्या माया कोडनानी यांना 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. माया कोडनानी यांना 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माया कोडनानी यांना 2014 मध्ये जामीन मिळाला होता. सध्या त्या अतिशय लोप्रोफ्राईल आयुष्य जगत असून राजकारणापासून दूर आहेत.