हिंगोली : नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात एक ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिलांचा (Women) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. हळद काढणीच्या कामासाठी या महिला ट्रॅक्टरमध्ये बसून कामावर जात असताना हा अपघात झाला. या विहिरीला कठडा नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शन सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने देखील मदत व बचावकार्य सुरू केले. त्यामुळे, विहिरीत पडलेल्या 10 पैकी 3 महिलांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र, एकाच गावातील 7 महिलांचा पाण्यात बुडून झाला. त्यामध्ये, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील दोन सुना पार्वती आणि सरस्वती यांनाही जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत. 

Continues below advertisement


हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीमध्ये शेतमजूर राहत होते नेहमीप्रमाणे हे नागरिक शेतमजुरीचे काम करत असत आज सकाळी शेतातील कामानिमित्त ट्रॅक्टरमध्ये बसून हे मजूर जात होते. दरम्यान गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये हे ट्रॅक्टर पडल्याने कामगार महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. विहिरीतून एकूण सात मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आली असून तीन जणांना वाचवण्यात स्थानिक व प्रशासनाला यश आले आहे. 


या घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एकाच गावातील 7 महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे गावातील एका कुटुंबातील दोन सुना म्हणजेच सख्ख्या जावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिलांना 2-5 वर्षांची लहान-लहान मुले आहेत. त्यामुळे, कोवळ्या वयातच काळाने मोठा सूड या चिमुकल्यांवर उगवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या 5 लाख रुपयांच्या मदतीने या कटुंबातील चिमुकल्यां आयुष्य तडीस जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.   


मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत


नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन म्हटले. तसेच, हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या. त्या महिलांना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. 3 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. 


हेही वाचा


राज ठाकरेंना राजकीय स्टंट करायचा होता, बँकांना राजकीय मैदान बनवू नका; तुळजापूकर यांची बोचरी टीका