मुंबई : दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्यापासून राज्य सरकारने राज्यातील मंदिरांसह धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयानंतर राजकारणही सुरु झालं आहे. सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार असल्याचं ट्वीट भाजपचे आमदार राम कदम यांनी केलं आहे.


राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं की, उद्या सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार. मंदिरं खुली करण्याच्या निर्णयानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरु होण्याची दाट शक्यता आहे.





राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी भाजपने विविध ठिकाणी आंदोलने केली होती. भाजपाने सिद्धिविनायक मंदिरातही आंदोलन केलं होतं. भाजपसस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर आंदोलन केलं होतं,. प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेशही केला होता. मनसेनेही महाराष्ट्रातील मंदिरं लवकरात लवकर उघडा अशी मागणी केली होती. याशिवाय एमआयएमनेही प्राथर्नास्थळं आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मदिरं सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र मंदिर खुली झाली तरी कोरोनासंदर्भातील खबरदारी म्हणजे मास्क, हँड सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन करणे भाविकांना बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे.  तर वंचित बहुजन आघाडीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश केला होता.


संबंधित बातम्या