मुंबई : पहाटे-पहाटे मुंबईच्या दिशेने रुळांवर धडधड करत वाऱ्याच्या वेगाने धावणारी रेल्वेची चाकं. प्रवास दररोज किमान दोनशे ते तीनशे किलोमीटरचा पण पोटा पाण्यासाठी मुंबईची वाट धरावी लागते. हा प्रवास करत असताना दोन- अडीच तास करायचं काय? हा प्रश्न सर्वांसमोर असतो आणि अशातच दोस्ती, दुनियादारी करत सोबत असणाऱ्या स्याक मधून बाहेर काढली जातात पत्त्यांचे कॅट्स. प्रवासात दोन-चार मित्र , सहप्रवासी ओळखीचे होतात. एक विरंगुळा म्हणून तर काही जण दररोजचा वर खर्च काढण्यासाठी खेळतात पत्त्यांचे वेगवेगळे डाव. आणि यातूनच दररोज बाहेरून मुंबईत येणाऱ्या आणि रात्री पुन्हा मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वेमध्ये सुरू होतो 'जुगार' ऑन व्हील.


दररोज या महानगरात संपूर्ण राज्यातून असंख्य रेल गाड्या येत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची उपनगरे आणि गुजरात, नाशिक-पुणे या परिसरातून लाखो लोक मुंबईत नोकरीसाठी येत असतात. सकाळी किमान तीन तास आणि रात्री किमान तीन तास असा सहा तासांचा प्रवास हे प्रवासी करत असतात. त्यामुळे या प्रवासात करायचं काय? सह प्रवाशांसोबत किती बोलायचं. मोबाईल असेल तर त्या मोबाईलवर गाणी किती ऐकायची याच्यावर मर्यादा येते. त्यामुळे अनेक जणांचा पत्ते खेळण्याकडे कल दिसून येतो. आता रेल्वेत पत्ते खेळणाऱ्यांची संख्या भरपूर जरी असली तरी आपण दररोज त्याकडे कानाडोळा करत असतो.

पत्ते खेळणे हा केवळ विरंगुळा किंवा टाईमपास असं जरी आपण म्हटलं तरीही हा खेळ केवळ मनोरंजन म्हणून काहीजण खेळतात तर काहीजण या खेळातून अर्थकारणही करत असतात. चार ते पाच जणांचं टोळकं सोबत आणलेल्या एका कागदी तगडावर पत्त्यांचा डाव मांडतात. पत्त्यां मधील वेगवेगळे खेळ त्या त्या गटा प्रमाणे ठरत असतात. दहा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत या खेळा मध्ये पैसे लावले जातात. ज्याचा डाव त्याचे पैसे या नियमाप्रमाणे एकावर एक डाव रंगत असतात. यामध्ये दररोज एका ट्रेनमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. काही संयमी तर काही अति उत्साही पत्त्यांचे खेळाडू या खेळांमध्ये सहभागी होऊन हा खेळ अधिक रंजक करतात.

काहीजण रोखीवर तर काहीजण उसनवारीवर देखील या खेळांमध्ये सहभागी होतात. गाडीतून उतरताना दुसऱ्या दिवशी पैसे परत करण्याचा वायदा करून ते निघूनही जातात. पैसे लावून पत्त्यांचे डाव खेळणं हे जरी बेकायदेशीर असलं तरी रेल्वेमध्ये मात्र दररोज टाइमपास च्या नावाखाली हा खेळ बिनदिक्कतपणे खेळला जातो. काहीजण हौसेपोटी, काहीजण विरंगुळा म्हणून तर काहीजण दररोजचा बिडी काडीचा खर्च निघावा म्हणूनही हा खेळ खेळतात. आता याला आपण विरंगुळा म्हणायचा की 'जुगार' म्हणायचा हे ज्याचं त्याच्यावर आहे. मात्र मुंबईत कामांसाठी येणाऱ्या या लोकांकडून बसल्या ठिकाणी धावत्या रेल्वेत हा खेळ खेळला जातो. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्या या रेल्वेमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल केली जाते.

अशा प्रकारे गेली बारा वर्ष प्रवास करणारे अजित पाटील सांगतात की, मी गेली बारा वर्ष रेल्वेने प्रवास करत आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान चार तासाचा माझा प्रवास होतो. या प्रवासात अनेकजण माझे मित्रही झाले आहे. या प्रवासात करायचं काय? हा प्रश्न इतरांप्रमाणे मलाही पडला होता, माझ्या आधीपासून येणाऱ्या प्रवाशांच्या पत्त्यांच्या खेळाकडे मी पाहत राहायचो. हळूहळू मी पण या डावात कधी सहभागी झालो हे मलाच कळलं नाही. कधी दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत पैसे हरतो, तर कधी शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत या डावातून मला पैसेही मिळतात. पण हा खेळ खेळत असताना आम्ही खेळाडूवर कोणतीही जोर जबरदस्ती करत नाही. प्रत्येक जण स्वच्छेने हा खेळ खेळतो. केवळ दहा रुपयांपासून या खेळाची सुरुवात होते. त्यामुळे मी दररोज किती डाव खेळायचं याचं नियोजन करून ठेवलेलं आहे. हा माझा केवळ एक टाईमपास आहे, असे त्यांनी सांगितलं.

रमेश पांडे सांगतात की, हा पत्त्यांचा खेळ आहे. मात्र याला जुगार म्हणता येणार नाही. आम्ही केवळ टाईमपास म्हणून हा खेळ खेळतो. नवीन अतिउत्साही खेळाडू सुरुवातीला भावनेच्या भरात आरडाओरडा करतात, मात्र आम्ही तो कंट्रोलमध्ये आणत असतो. प्रत्येक जण आपल्या मर्जीप्रमाणे खेळतात. शंभर रुपयांच्या पुढे जर कोणी हारत असेल तर त्याला इतर खेळाडू सुद्धा सावध करतात. कारण हा खेळ दरोज खेळला जातो, त्यामुळे प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे असं आमचं मत आहे. आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही. प्रवासातले दोन ते अडीच तास कसे काढायचे हा प्रश्न आमच्या समोर असतोच. त्यामुळे इतर खेळा प्रमाणे आमच्या आवडीप्रमाणे आम्ही हा पत्त्यांचा खेळ खेळत असतो. यात कुणाचे अधिक नुकसान होऊ नये याकडे आम्ही पाहत असतो. केवळ खेळ म्हणूनच याकडे पाहावं असं मला तरी वाटतं.

खेळामधील अलिखित नियम

या खेळाचे काही अलिखित नियम आहेत. या नियमांचं पालन रेल्वेतून प्रवास करणाऱ्या या खेळाडूंना करावे लागते .

1) चार ते पाच जणांच्या ग्रुपमध्ये किमान दोन पत्त्यांचे केट्स घेणे बंधनकारक आहे.

2) दोघांनी पत्त्यांचे कॅट तर इतरांनी त्यासाठी वापरण्यात येणार कागदी तगडा ( पुठ्ठा ) व्यवस्थित आणणे

3) पत्ते खेळत असताना इतर सहप्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.

4) खेळत असताना जर डाव लागला तर उत्साहाच्या भरात त्याचं प्रदर्शन करायचं नाही.

5) डाव लागल्यानंतर सह खेळाडूंकडून मिळणारी रक्कम मोजून घेऊन ती ताबडतोब खिशात ठेवणे.

6) विजेत्याला रक्कम दिल्यानंतर मोड नसेल तर मोड झाल्यानंतर प्रामाणिकपणे ते पैसे सह खेळाडूला परत करणे.

7) 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच डाव लावणे.