साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भावनांशी सहमत, त्यांच्याशी भेटून चर्चा करु : गृहमंत्री अनिल देशमुख
एबीपी माझा, वेब टीम | 11 Jan 2020 09:12 PM (IST)
धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरुन अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचींग), विरोधात मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकाराविरोधात साहित्यिकांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला.
मुंबई : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेले आवाहन विचार करण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्राचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या या मंचाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन काल आवाज उठवला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरुन अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचींग), विरोधात मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकाराविरोधात साहित्यिकांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. देशाला वेठीस धरले जात आहे अशी टीका केली. फादर दिब्रिटो यांच्यासह संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, कवियित्री अनुराधा पाटील आदींनी देशातील सद्यपरिस्थितीवर टीका केली. संबंधित बातम्या