पुणे: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  शेतकऱ्यांनी बहुतेक ठिकाणी दुधाचे टँकर, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या आहेत.


मुंबईत दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी झेड सुरक्षा देत टँकर रवाना करण्यात आले आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या दूध टँकरला झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहेत. पोलिसांच्या ताफ्यासह दुधाचे टँकर, पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टँकर रवाना झाले. हे एकूण 27 दुधाचे टँकर असून, पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे.

मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध दुपार पर्यंत पोहचविण्यात येणार आहे.