सावित्री नदीवरील पुलाचा पुनर्जन्म, आज लोकार्पण
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2017 09:11 AM (IST)
रायगड : रायगडच्या महाडमधील सावित्री नदीवरील नव्या पुलाचं आज (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी बुडाली. तर सर्वच्या सर्व 40 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी 6 महिन्यात नवा पूल उभारण्याची घोषणा केली होती. मात्र दहा महिन्यांनी या पुलाचं लोकार्पण होणार आहे. त्यानुसार हा तीन पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला असून आजपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नवीन पुलामध्ये अँटीक्रॅश बॅरियर आणि दोन्ही बाजूने एक मीटर रुंदीचा फूटपाथ असेल. 239 मीटर लांबीच्या तीन पदरी पुलाच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. संबंधित बातम्या महाडच्या सावित्री नदीवरील पूल पुन्हा सेवेत! महाड दुर्घटना : बुडालेली एसटी बस सापडली