नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन ही भेट घेतल्याचं कळतंय.


सत्ताधारी पक्षाने तेही केंद्र आणि राज्य अशा दोन्हीमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने एका राज्यात कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावर इतर राज्यात मागणी होणं साहजिक आहे, असं शरद पवार मोदींना म्हणाले.

तसंच महाराष्ट्रातलं शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नसल्याचंही पवारांनी नमूद केलं.

केंद्राचे हात वर

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण केंद्रानं याबाबतीत पुन्हा हात वर केले. हा निर्णय राज्यांनीच करायचा ही भूमिका कायम असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं.  त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात बॉल टोलवल्याचं चित्र आहे.

पवार मोदींना नेमकं काय म्हणाले?

  • "देशभरात दरवर्षी 12 हजार आत्महत्या होतात अशी सरकारची सुप्रीम कोर्टातील आकडेवारी सांगते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांत ही आकडेवारी सगळ्यात जास्त आहे. या तीन राज्यांमध्ये कर्जमाफीची गरज जास्त आहे. म्हणून तुम्ही हा प्रश्न गांभीर्याने घ्या"- शरद पवार


शेतकरी आंदोलनात पोलीस बळाचा जास्त वापर होतोय

  • "ज्या मागण्यांसाठी विरोधात असताना तुम्ही आंदोलन करत होता, त्याच मागण्यांसाठी शेतकरी उद्वेग करत रस्त्यावर आला, तर त्यासाठी पोलीस बळ वापरण्याची काय गरज. हे गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत" - शरद पवार


फडणवीसांना खोचक टोला

तीन वर्षे झाली तरी, विद्यार्थी अभ्यासच करतोय, असा खोचक टोला शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

चंद्रकांत पाटलांना टोला

आता शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या शरद पवार यांना 15 वर्षात हमीभाव का देता आला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

त्यावर बोलताना पवार म्हणाले,"चंद्रकांत पाटील यांना कदाचित माहिती नसेल की मुळात स्वामीनाथन आयोगाची नियुक्तीच मी केली होती. पदवीधर मतदारसंघातून येत असल्यानं माध्यमिक शिक्षणांचे प्रश्न सोडवण्यातच त्यांचा वेळ गेला असावा, त्यामुळे त्यांना शेती, शेतकरी या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसावा"

राज्यात शेतकरी संप

राज्यात गेल्या सहा दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. त्यातच शेतकऱ्यांनी काल महाराष्ट्र बंद केला होता. अजूनही संपाची धग कायम असल्याने भाजीपाल आणि दुधाचा तुटवडा जाणवत आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पिकाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप पुकारला आहे.

मात्र या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला होता.

आता शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या शरद पवार यांना 15 वर्षात हमीभाव का देता आला नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

त्यामुळे आता शरद पवारांनीच थेट मोदींची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकरी संपाची धग दिल्लीत पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी कळवळा दाखवणाऱ्या पवारांनी 15 वर्षात हमीभाव दिला का? : चंद्रकांत पाटील

काहींचा शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु : जयाजी सूर्यवंशी

शेतकरी संपात फूट पाडल्याच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम

महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम

साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम

साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?

नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम