मुंबई : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या 5 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तर 6 तारखेला संपूर्ण सरकारी कार्यालयांना कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.


नगर जिल्ह्यातील पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी केली जाणार आहे. त्यासाठी शेतकरी मुंबईत येणार आहेत. रात्री 11 वाजता ही बैठक सुरु होईल.

दिवसभरात कुठे काय घडलं?

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाला गिरणी कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. शनिवार म्हणजे 3 जून रोजी सायंकाळी 4 ते 5 दरम्यान करी रोड येथे कामगारांकडून निदर्शनं केली जातील.

सोलापूर - भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जनहित शेतकरी संघटनेने मोहोळ शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. शेतकऱ्यांच्या संपाबाबत बेजबाबदार वक्तव्य केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांनी संप केल्यास भाजीपाला आयात करण्याच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यातं आलं.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं सामूहिक मुंडन

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात उद्रेक पाहायला मिळाला. मात्र डांगसौदाणे गावाने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारची तिरडी घेऊन गावकऱ्यांनी अंत्ययात्रा गावभर फिरवली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडन करुन सरकारचा निषेध केला.

धुळे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक (सीआरपीसी १४९) अन्वये नोटिसा जारी करण्यात आल्या.

नंदुरबार बाजार समितीत आवक 90 टक्क्यांनी घटली

नंदुरबार - शेतकरी संपाचा परिणाम दुसऱ्या दिवशी नंदुरबार बाजार समितीत पाहण्यास मिळाला. नंदुरबारच्या भाजीपाला बाजारात येणारी आवक 90 टक्के कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याचा दरावर झाला असून भाजीपाल्याचे भाव  दुप्पट झाले आहेत.

चंद्रपूर : शेतकरी संपात शेतकरी संघटनाही उतरणार आहे. 4 जून रोजी तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट येथे तेलंगणातून येणारा दूध, भाजीपाला रोखण्यात येणार आहे. शेतकरी संघटना नेते वामनराव चटप यांनी ही माहिती दिली.

शेतकरी संपाला पाठिंबा, मध्यस्थीला तयार : अण्णा हजारे

शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शेतकरी संपाला पाठिंबा दिला. शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा, याच्याशी आपण सहमत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपण सरकारशी मध्यस्थी करायला तयार असल्याचंही अण्णांनी सांगितलं.

बुलडाणा - प्रहार संघटनेने दूध फेको आंदोलन करत शेतकरी संपात सहभाग घेतला. दहा हजार लीटर्सचा टँकर रस्त्यावर रिकामा करण्यात आला.

नागपूर - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटना आणि विदर्भवाद्यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजी आणि कांदे फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात दूध फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नवी मुंबई - साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदेंना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी आंदोलन केलं. कांदा, बटाटा मार्केट, मसाला मार्केट बंद पाडण्याचा केला प्रयत्न. नवी मुंबई एपीएमसीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं.

अहमदनगरमध्ये अटकसत्र

अहमदनगरला शेतकरी संपात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर आणि रामदास घावटे यांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांच्यासह कार्यकर्त्यांवरही अटकेची टांगती तलवार आहे.

दरम्यान अहमदनगरला शेतकरी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. नगर मार्केटला भाजीपाल्याची केवळ 5% आवक झाली. शेतकऱ्यांनी शेतमाल मार्केटला आणलाच नाही. आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. परवाच्या तुलनेत घाऊक बाजारात 50 टक्के दरवाढ तर किरकोळ दरात 60 ते 70 टक्के दरवाढ झाली आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यात मार्केट यार्डला भाजीपाल्याची 1 लाख 40 हजार क्विंटल आवक होती. मात्र आज साधारण 4 हजार क्विंटल आवक झाली.

औरंगाबादमध्ये फेकण्याऐवजी मोफत दूध वाटप

औरंगाबाद तालुक्यातील आडगावच्या शेतकऱ्यांनी दूध मोफत वाटप करत अनोखं आंदोलन केलं. दूध रस्त्यावर ओतून दिलं तर वाया जातं म्हणून दूध वाया जाण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलं पाहिजे, या भावनेतून शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटप केलं.

पुणे - बारामती तालुक्यातील सुपे येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीमार

करण्यात आला. एपीआय सचिन पाटील यांनी लाठीमार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकरी संपाच्या समर्थनार्थ सकाळपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. आंदोलन संपत असताना पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाशिम - रिसोड तालुक्यातील मोप येथे शेतकऱ्यांनी रस्तारोको करुन शेतकरी संपाला पाठिंबा दिला. त्यामुळे रिसोड-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर हराळ गावातही शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला.

एसटीतून भाजीपाला, दूध नेण्यास बंदी

एसटीतून भाज्या, दूध, फळांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात दूध, भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संपकरी शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने एसटीतून फळ, दूध आणि भाजीपाला नेण्यास बंदी घातली आहे.