मुंबई : शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. कारण सुकाणू समिती आणि सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आहे.


कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शेतकरी फटाके फोडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत आहेत. डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. मांडवगण फराटा ,शिरसगाव काटा या गावांमध्ये फटाके फोडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं.

नाशिक जिल्हा, जिथे शेतकरी आंदोलनाने हिंसक रुप घेतलं होतं, तिथेही कर्जमाफीच्या निर्णयानंतर आनंदाचं वातावरण आहे. येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आणि सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

सोलापूर जिल्ह्यातही कर्जमाफीनंतर आनंदोत्सव सुरु आहे. पंढरपूर, मंगळवेढा या भागात शेतकऱ्यांनी फटाके फोडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सलगर बुद्रूकमधील शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन करून आणि पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं.

शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात सलगरमधील शेतकऱ्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. सरकारने अल्पभूधारकांची कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांनी सरकारचे आभारही मानले आहेत.

संबंधित बातम्या :

सरकारच्या निर्णयानंतर बच्चू कडूंचं सुतळी बॉम्ब फोडून सेलिब्रेशन


सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य, शेतकरी आंदोलनाला ऐतिहासिक यश