धुळे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) जागावाटपापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीतून (Mahayuti) बाहेर पडावे, यासाठी भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Group) प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजित पवारांचा (Ajit Pawar) काटा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.  


आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत  जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आपाल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील करत आहेत. त्यातच भाजप नेत्यांनी कुठल्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 


अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...


यावरून संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे हे अजित पवारांना दूर लोटण्याचं काम करत करत असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला विधानसभेच्या निवडणुका एक संघ राहून लढवाव्या लागतील. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडल्याचे केलेले काम हे त्यांना भरावं लागणार आहे. जर त्यांनी अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर हे महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेलं नाटक असेल, त्यापलीकडे त्याला काही महत्त्व नाही. ते कोणीही एकमेकांना सोडू शकत नाही. ते एकच आहेत आणि एकच राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 


नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 


अजित पवार यांना दूर लोटण्याचा कार्यक्रम आता भाजपने सुरु केला आहे. त्यामध्ये मिंधे गटाचे काही नेते सामील आहेत. अजित पवार यांना बाहेर काढलं तर जास्त जागा लढवता येतील, हे यामागील राजकारण आहे. अजित पवार काकांशी बेईमानी करुन आणि इतका मोठा धोका पत्कारुन भाजपसोबत आले. पण, आता त्यांची गरज संपली आहे. त्यामुळे अजित पवार यांना अडचणीत आणणारी वक्तव्यं आणि भूमिका भाजप व शिंदे गटाकडून घेतल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.


आणखी वाचा 


जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे; नवनाथ वाघमारेंचा संभाजीराजेंवर घणाघात