Tanaji Sawant :  राज्यातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी विविध शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. आता तरुणाईला दारुच्या व्यवसनापासून दूर करण्यासाठी बिअर बार, परमिट रुमवर फलक लावण्याची सूचना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केली आहे. 'आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे' असे बोर्ड लावावेत अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.


धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 50 खाटाचे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत बोलत होते. त्यांनी म्हटले की, आजच्या स्पर्धेच्या युगात सध्या तरुणाई नैराश्याकडे जात आहे. युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षा अपयश, शिक्षण, व्यवसाय यात अपयश आले की तरुणाईला एकच तोडगा दिसतो, तो म्हणजे परमिट रूम व बिअर बार. म्हणून मी आरोग्य विभागाला आवाहन करतो की आरोग्य विभागाने ज्या ज्या ठिकाणी परमिट रूम आणि बिअर बार आहेत त्या ठिकाणी 'आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे' असे बोर्ड लावावेत असे सांगत आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी नवीन संकल्पना मांडली.


आरोग्य मंत्री सावंत यांनी म्हटले की, तरुणाई महाराष्ट्राचे वैभव आहेत त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊ नये. अपयश ही यशाची पहिली पायरी, ज्याला पाचवता येते तो यशाच्या सर्वोच्च शिखरावर जातो, जो अपयशी होतो तो व्यसनाच्या मार्गावर जात आहारी जातो. त्यामुळे तरुणांनो अपयश आल्यावर खचून जाऊ नका, आपण लढाई जिंकू शकतो हे कायम मनात ठेवा व लढा त्यानंतर यश नक्की मिळते असेही त्यांनी म्हटले. 


आपण हरतो ही मानसिकता बदलली तर यश मिळते. जेव्हा आपण मनापासून लढतो तेव्हा आपले कर्म व प्रारब्ध साथ देते असे सांगत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी "आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे" ही संकल्पना मांडली, प्रत्येक ठिकाणी बिअर बार समोर असे बोर्ड लावा असे आवाहन केले.


वेळेत काम पूर्ण करा, अन्यथा...


आरोग्यमंत्री सावंत यांनी म्हटले की,  ठेकेदाराने वेळेत हे काम पूर्ण केले तर स्वतः त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस लवकर रुग्णसेवा दिल्याने देऊ असे जाहीर केले. मात्र येथे काम पूर्ण नाही केले तर मी ते खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 


आरोग्याचा अधिकार विधेयक आणणार


येत्या आर्थिक अधिवेशनात "राईट टू हेअल्थ" म्हणजे आरोग्याचा हक्क हा कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात सुद्धा आपण सत्तेत असणार आहोत. मात्र, खाते कोणते हे सांगता येत नाही त्यामुळे जाता जाता हे आरोग्य खाते असताना महाराष्ट्रमधील 12 कोटी 50 लाख जनतेला आरोग्याचा अधिकार हा कायदा देणार असे त्यांनी सांगितले.