नागपूर: कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक आगळवेगळं संशोधन केलं आहे. त्यामुळे आता कापसाचं पिक चक्क 100 ते 120 दिवसात येणार आहे. आतापर्यंत कापसाचं पीक येण्यासाठी 170 ते 240 दिवस लागत होते. मात्र, नव्या संशोधनानं फार अमूलाग्र बदल होणार आहे. दरम्यान, कापसाच्या या नव्या जातीला ‘युगांक’ असं नाव देण्यात आलं आहे.


कापसाचं पीक येण्यासाठी जास्तीत जास्त 240 दिवस लागत असल्यानं शेतकऱ्याचा खर्च वाढतो. मात्र, आता या कापसाच्या नव्या बियाण्यामुळे शेतकऱ्याचा खर्च आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. विदेशात अनेक ठिकाणी कापूस हा 140 ते 150 दिवस येतो. मात्र हे संशोधन जर शेतापर्यंत पोहचले तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

 

काही संशोधनं ही समाजजीवनच बदलू शकतात. असंच एक संशोधन नागपूरमध्ये झालं आहे. हे संशोधन नागपूरमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च ह्या संस्थेच्या संतोष एच बी ह्या तरुण संशोधकानं केलं आहे. गेली चार वर्ष तो या संशोधनावर काम करत होता. त्यानंतर त्यानं 100 ते 120 दिवसात पूर्णत्वाला येणाऱ्या कापसाची प्रजाती तयार केली. भारताच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत मोठे आहे. कारण भारतात आजही कापसाला २४० दिवस लागतात.

चार वर्षाच्या संशोधनात गेली दोन वर्ष या पिकाची सातत्याने चाचणी केली जात होती. या दोनही चाचणीमध्ये कापसाचं पीक १२० दिवसात ते पूर्णत्वाला आलं. मात्र, असं असलं तरी याची आणखी चाचणी होणार आहे. आतापर्यंत नागपूर आणि कोईम्बतूर इथं या पिकांची चाचणी झाली. मात्र, आता देशभरातील १७ ठिकाणी या पिकांची चाचणी होणार आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यापर्यंत हे बियाणं पोहचायला काही वेळ लागू शकतो.

...म्हणून कापसाच्या नव्या प्रजातीला ‘युगांक’ नाव!
दरम्यान, या नव्या प्रजातीवर धारवाडमधील कापूस संशोधक एस एस पाटील यांनी संशोधन सुरु केलं होतं. त्यांनी आपलं हे संशोधन कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलं होतं. मागील वर्षी पाटील यांच्या मुलाचं अचानक निधन झालं. त्यामुळे कापसाच्या या नव्या प्रजातीला एस एस पाटील यांच्या मुलाचं 'युगांक' हे नाव देण्यात आलं.