छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) काल रात्री झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळानं घाला घातला. समृद्धी' महामार्गावर काल अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने (RTO) थांबवला असतानाचा व्हिडीओ समोर आलाय. याच ट्रकला धडकून ट्रॅव्हल्समधील 12 जणांचा मृत्यू झालाय. हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.   प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचं नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.


सैलानीबाबाच्या यात्रेसाठी गेलेल्या नाशिककरांसाठी कालची रात्र काळरात्र ठरली. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जांबरगाव टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय.ज्यात लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे.समृद्धी महामार्गावर आरटीओने अवैधरीत्या थांबवलेल्या ट्रकला ट्रॅव्हलरच्या चालकाची झोपेत धडक दिल्याने अपघात झाला आहे. आरटीओने हायवेवर  अपघातग्रस्त ट्रकला थांबवल्याचा  व्हिडीओ समोर आली आहे.  या व्हिडीओनंतर समृद्धी महामार्गावरील अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट आले आहे.


समृद्धी महामार्गावर ट्रक थांबवून अशी कारवाई करता येते का?


समृद्धी महामार्गावरील अपघातातील जखमींच्या मते आरटीओची गाडी ट्रकचा पाठलाग करत होती. टोलनाक्यापासून काही अंतर पुढे गेल्यावर आरटीओनं ट्रकला थांबवलं. ट्रक महामार्गाच्याकडेला उभा राहिला पण त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या टेम्पो ट्रॅव्हरलरची ट्रकला जोरदार धडक बसली . समृद्धी महामार्गावर ट्रक थांबवून अशी कारवाई करता येते का? रात्रीच्या वेळेला महामार्गावर ट्रक थांबवता येतो का असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आरटीओच्या वाटमारीमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. तर टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते असा दावा संदीपान भुमरेंनी केलाय. अपघातातील गंभीर जखमींना वैजापूरमधलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाखांची मदत जाहीर केलीय..जखमींवरही सरकारी खर्चातून उपचार करण्यात येणार आहेत.


कोट्यवधी रुपयांचा खर्च करून समृद्धी महामार्ग बनवला खरा मात्र त्यावरील अपघातांचं सत्र थांबता थांबत नाही. ओव्हर स्पीड, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि अपुऱ्या सुविधा ही त्यामागची कारणं आहेत. यावेळच्या अपघातामागे मात्र आरटीओ अधिकाऱ्यांची चूक असल्याचे व्हिडीओवरून स्पष्ट झाले आहे. 


पाहा व्हिडीओ :