छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रक्रार समोर आला असून, 'समृद्धी' महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) टोल नाक्यावर काम करणाऱ्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली आहे. टोलनाक्यावर काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना परप्रांतीय कर्मचारी धमकावत असल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यामुळेचं मनसैनिकांनी परप्रांतीय कर्मचाऱ्याला चोप दिल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून या टोल नाक्यावर स्थानिक कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने वादाच्या घटना सतत समोर येत आहे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे. 


छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाका मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. दरम्यान, आज पुन्हा एकदा हा टोल नाका चर्चेत आला आहे. या ठिकाणी करणाऱ्या स्थानिक मराठी कर्मचाऱ्यांना परप्रांतीय कर्मचारी धमकावत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकारी यांनी टोल नाक्यावर काम करणाऱ्या परप्रांतीय कर्मचारी यांना मारहाण केली आहे. टोल नाक्यावर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण का करता म्हणत टोल नाका कंपनीच्या परप्रांतीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेच्या नाशिक शहराध्यक्ष अक्षरा घोडके यांनी मनसे स्टाईलने उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी परप्रांतीय कर्मचारी यांना मारहाण देखील केली आहे.


समृद्धीवर ट्राफिक जाम...


मागील काही दिवसांपासून वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्यावर स्थानिक कामगार आणि  परप्रांतीय कर्मचारी यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे अनेकदा स्थानिक कर्मचारी यांनी टोल नाका बंद करून आंदोलन देखील केले होते. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच मनसेच्या नाशिक शहराध्यक्ष अक्षरा घोडके या आज आपल्या कार्यकर्त्यांसह टोल नाक्यावर जाऊन धडकल्या. यावेळी त्यांनी परप्रांतीय कर्मचारी यांना जाब विचारत मारहाण देखील केली. त्यामुळे टोल नाक्यावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. तर, टोल नाका देखील बंद करण्यात आला होता. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


यापूर्वी देखील झाला होता वाद...


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यातील जांबरगांव येथे टोल नाका आहे. दरम्यान, याच टोल नाक्यावर कामाला असलेल्या स्थानिक कर्मचारी आणि परप्रांतीय अधिकारी यांच्यात पगार देण्यावरून नेहमीच वाद घडतांना पाहायला मिळाले आहे. तर, परप्रांतीय अधिकारी वाईट वागणूक देऊन सतत धक्काबुक्की करून अपमान करत असल्याचा आरोप स्थानिक कामगारांनी केला आहे. विशेष म्हणजे याच कारणावरून अनकेदा टोल स्थानिक कामगारांनी टोल नाका बदन देखील पाडला असल्याचे घटना यापूर्वी घडल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मेसच्या डब्याच्या पैसे न दिल्याने चक्क समृद्धी महामार्ग बंद पाडला, संभाजीनगरमधील घटना