Manoj Jarange Protest : आक्रमक झालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईकडे निघाले असताना, त्यांनी आपला ताफा पुन्हा माघारी वळवत अंतरवाली गाठलं आहे. पोलिसांनी जालना (Jalna) जिल्ह्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने, जरांगे माघारी फिरले आहेत. आंतरवालीमध्ये जाऊन पुढील निर्णय घेऊ, सर्वाना शांतता राखावी, हट्टवादी भूमिका घेऊन मला लोकांना अडचणीत आणायचं नाही, फडणवीस तू चूक केली, सागर बंगल्यावरच आमंत्रण देऊन दार लावून घेतोय, संचारबंदी निघू द्या मुंबईला जाईल, आंदोलकांनी आपापल्या घरी जावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


मुंबईकडे निघालेल मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीत... (Manoj Jarange returned Antarwali Sarathi)


देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील उपोषणास्थळी असलेल्या व्यासपीठावरून उतरून थेट थेट मुंबईज्कडे निघण्याची घोषणा केली. यावेळी त्यांना गावकऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. पुढे भांबेरी गावात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. तर आज सकाळी त्यांनी आपली भूमिका बदलत पुन्हा आंतरवाली सराटी गाठली आहे. 


अंबड तालुक्यात संचारबंदी लागू... (Curfew in Ambad taluka) 


मनोज जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाल्याने मराठा आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत मुंबईकडे निघाले होते. जरांगेंच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या आंतरवाली सराटी गावात असून, त्यांनी मराठा आंदोलकांना घरी जाण्याचे आवाहन केले आहेत. 


मराठवाड्यातील 'या' भागात इंटरनेट सेवा बंद... (Iternet Service Closed In Marathwada)


मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक पोस्ट, व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले आहेत. 


शांतता ठेवण्याचे जरांगेंचं आवाहन...


मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा समाजाने शांतता ठेवण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहेत. आंतरवाली सराटीमध्ये बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तसेच, मी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार होतो आणि त्यांनी मला आमंत्रण दिले होते. मात्र, आता संचारबंदी लावून त्यांनी दारे बंद केली आहे. त्यामुळे आमचा विजय झाला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


जरांगेंचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात... 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणाऱ्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. 


आताची स्थिती काय...


मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे आता पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत पोहचले आहेत. पुढील काही वेळेत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे आंतरवाली आलेल्या लोकांना जरांगे यांनी घरी परत पाठवले आहेत. संचारबंदी उठवल्यावर परत या असेही जरांगे म्हणाले आहेत. 


सरकारची भूमिका...


मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या सरकारनं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सगेसोयऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे पाटलांची भाषा राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तर, माझ्यावर केलेलं आरोप बिनबुडाचे असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना शिवीगाळ करणे आपली संस्कृती नसल्याचे म्हणत अजित पवारांनी देखील मनोज जरांगे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 


विरोधकांच्या प्रतिक्रिया...


मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी देखील सरकारवर टीका केली आहे. हे राज्य आहे की गुंडा राज्य आहे असा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण हे बघण्यापेक्षा ते का बोलतात हे बघावं लागेल. बोलावते धनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना?, दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प असताना मुख्यमंत्री जरांगे यांना भेटले होते. जरांगे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल का बोलत नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Manoj Jarange Mumbai March Live Update : मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीत, मराठवाड्यातील इंटरनेट सेवा बंद, मराठा आंदोलनाची प्रत्येक अपडेट...