Hingoli News : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका (Election) जाहीर झाल्या असून, 28 एप्रिलला मतदान प्रकिया पार पडणार आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत आहे. मात्र मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक रद्द करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतला आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी सेवा संस्था मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचे शुक्रवारी निधन झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीत मानवत बाजार समितीच्या 18 संचालक पदांसाठी एकूण 51 उमेदवार रिंगणात उतरले होते. अर्ज मागे घ्यायची मुदत संपल्यानंतर 21  एप्रिल रोजी रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार होते. तर याच निवडणुकीत मंगरुळ येथील उमेदवार रावसाहेब कदम यांनी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात अर्ज दाखल केला होता. मात्र, 21 एप्रिल रोजी कदम यांचे निधन झाले. त्यामुळे ही रद्द करण्याची मागणी विजभज प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेले उमेदवार गणेश नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.


निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश 


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचे शुक्रवारी निधन झाले. ऐन निवडणुकीत दुर्दैवी घटना घडल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. तर निवडणूक रद्द करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले होते. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी सुरु असलेली बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.


पुन्हा नव्याने पुन्हा निवडणूक प्रकिया पडणार का?


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब कदम यांचे निधन झाल्याने निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र, या आदेशात निवडणूक प्रक्रिया आहे त्या स्थितीत पुन्हा सुरु होणार की, पूर्ण प्रक्रिया नव्याने होणार, याबाबत स्पष्ट आदेश नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. तर नव्याने पुन्हा निवडणूक प्रकिया पडणार का? असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli News:  केळीच्या भावात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात