Marathawada News: काय सांगता! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बोधवाक्यच चुकीचे?

मोसीन शेख Updated at: 29 Mar 2023 08:19 PM (IST)

Marathwada University : 65 वर्षांमध्ये एकाही प्राध्यापकाने किंवा कुलगुरुंचे याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

काय सांगता! 'मराठवाडा विद्यापीठा'चे बोधवाक्यच चुकीचे, 65 वर्षांत कुणाच्याच लक्षात आले नाही

NEXT PREV

Marathwada University : ज्ञानाचा स्रोत म्हणून प्रत्येक विद्यापीठाकडे आदराने पहिले जाते. मात्र त्याच विद्यापीठाचे बोधवाक्यच चुकीचे असले तर, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण असेच काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) बाबतीत घडताना पाहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बोधवाक्य प्रत्येक ठिकाणी चुकीचे छापलेले असूनही गेल्या 65 वर्षांमध्ये एकाही प्राध्यापकाने किंवा कुलगुरुंचे याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील 181 क्रमांकाची ओवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपलं बोधवाक्य म्हणून स्वीकारली आहे. ज्ञानेश्वरीत छापलेल्या मूळ वाक्यनुसार हे बोधवाक्य "हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि।।" असे आहे. याचा अर्थ म्हणजे "ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे."असा होतो. परंतु विद्यापीठ प्रशासनाने सर्व ठिकाणी छापलेले बोधवाक्य पाहिल्यास " हे ज्ञानिची पवित्रता। ज्ञानीची आथि।। असे आहे. विद्यापीठ प्रशासनाने 'ज्ञानाची' शब्दाचा उल्लेख 'ज्ञानिची' केला आहे. त्यामुळे ज्ञानाचा स्रोत म्हणून ज्या विद्यापीठाकडे पहिले जाते,  त्या विद्यापीठाला आपले बोधवाक्यही नीट लिहीता येत नसेल तर विद्यार्थ्यांनी कुणाकडे आशेने पाहावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 




1958 पासून कुणालाच कसे कळले नाही?


'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते' या गीतेमधील ओळीचे मराठी रूपांतर करताना संत ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे 'ज्ञानाची पवित्रता' असे लिहिलेले असताना, त्यात 'ज्ञानिची पवित्रता' असा बदल कुणी केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच हे बोधवाक्य रोज पाहूनही 'ज्ञानिची पवित्रता' या वाक्याला काही अर्थ आहे की नाही? हा प्रश्न सन 1958 पासून कुणालाच कसा पडला नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. 


विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष...


डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची राज्यात वेगळी ओळख आहे. या विद्यापीठाचा नामांतराचा इतिहास खूप मोठा आहे. तर याच विद्यापीठातून आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडले आहेत. मात्र गेल्या  65  वर्षांपासून या विद्यापीठ प्रशासनाकडून चक्क बोधवाक्य चुकीचे लिहले जात असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या विद्यापीठात आजपर्यंत अनेक उच्चशिक्षित शिक्षकांनी आपलं आयुष्य घातले आहे. अनेकांना याच विद्यापीठाने वेगवेगळ्या विषयात पी.एच. डी. प्रदान केली आहे. पण त्याच विद्यापीठाचे बोधवाक्यच चुकीचे असल्याने येथे शिक्षणा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुणाकडे आशेने पाहावे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर आता यावर विद्यापीठ प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 



मी जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेलो तेव्हा, विद्यापीठाच्या बोधवाक्याने माझे लक्ष वेधून घेतले. त्यात 'ज्ञानिची' हा एकच शब्द दोन प्रकारे लिहिलेला दिसल्यामुळे, त्याचा शोध घेतला. तेव्हा ही ओळ ज्ञानेश्वरीत सापडली. पण तेथे 'ज्ञानाची पवित्रता' असे लिहिलेले दिसले. मग लक्षात आले की, गेल्या अनेक वर्षांपासून हे बोधवाक्य चुकीचे वापरले जात आहे.- विनोद जैतमहाल, जालना


इतर महत्वाच्या बातम्या :


Gharkul Scam: छ. संभाजीनगरच्या घरकुल निविदा घोटाळ्यात दोन हजार पानांची कागदपत्रे ईडीने घेतली ताब्यात


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI
Published at: 29 Mar 2023 08:19 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.