Marathwada Rain Update: मार्च महिन्याच्या सुरवातीपासून मराठवाड्यात (Marathwada) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. विभागातील धाराशिव सोडलं तर इतर सर्वच जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. आता अशात पुन्हा एकदा मराठवाड्यात अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (Meteorology Department) वर्तवला आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने, राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतकरी अजूनही त्यातून सावरले नसताना, आता पुढील 24 तासांत मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


मागील 24 तासांत कोकणासह उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तर आज (गुरुवारी, 23 मार्च) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर तमिळनाडूपासून कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. 


शेतकऱ्यांची चिंता वाढली...


मार्च महिन्यात आतापर्यंत दोन वेळ अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हजारो हेक्टरचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची परिस्थिती आहे. आधी अतिवृष्टीने खरीप गेले आणि आता अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान केले आहे. त्यातच आता पुन्हा मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजूनही अनेक ठिकाणी गहू आणि ज्वारीची पिके शेतात उभी आहेत. त्यामुळे जर अवकाळी पाऊस झाला तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू अडवा झाला असून, काढणीसाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे. पण पुन्हा पाऊस आल्यावर या गव्हाच्या पिकाची माती होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून अंधारातच नुकसानग्रस्त भागाची पाहाणी; शेतकऱ्यांची तीव्र नाराजी