Maharashtra Samruddhi Mahamarg News: नागपूर (Nagpur) आणि मुंबई (Mumbai) दरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी जलद गती असा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सुरू करण्यात आला. पण उद्घाटनापासूनच हा महामार्ग अपघातांचा महामार्ग झाल्याचं पाहायला मिळालं. समृद्धीवरच्या अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नावच घेईना, अशातच पुन्हा एकदा एका नव्या कारणानं या महामार्गाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्याचं कारण म्हणजे, समृद्धी महामार्गावरील (Mumbai-Nagpur Expressway) अतिक्रमण, अनधिकृत फूड स्टॉल्स. 


मोठा गाजावाजा करत नागपूर-मुंबई असा 701 किमीचा ग्रीनफिल्ड सुपर एक्स्प्रेस कॉरिडॉर बनविण्यात आला. त्याचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सुरू करण्यात आला. सुरुवातीला सांगण्यात आलं की, महामार्ग अतिशय वेगवान वाहनांसाठी एक्सेस कंट्रोल असेल, पण आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना कुठेही महामार्गावर वाहनं थांबवता येत नाही, कारण थांबलेल्या वाहनांवर मागून येणाऱ्या भरधाव वाहनांचा अपघात होऊ शकतो, असा नियम असताना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गाच्या हद्दीतच अनेक जणांनी अनधिकृतरित्या चक्क हॉटेल्स आणि फूड स्टॉल्स सुरू केले आहेत. त्यामुळे महामार्गावरच ट्रक, कार थांबून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात. 




ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. मेहकर जवळील डोनगाव पेट्रोल पंप परिसरात असे अनेक स्टॉल्स आणि हॉटेल्स पाहायला मिळतात. वेगवान महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर धडकून गेल्याच आठवड्यात एक मोठा अपघात झाला होता. मात्र तरीही रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, हे फूड स्टॉल्स महामार्गाच्या सुरक्षा भिंतीच्या आत असल्यानं याठिकाणी अनेक वाहने थांबत असतात आणि अशा वाहनांवर मागून येणारी भरधाव वाहनं धडकून मोठा आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. 


आतापर्यंत 'या' महामार्गावर कशामुळे झालेत अपघात? 



  • भरधाव वाहन चालत असताना टायर फुटून अपघात होणे.

  • रस्त्यावर आलेल्या वन्य प्राण्यांना धडकून अपघात होणे.

  • वाहन चालकाला झोप आल्यामुळे अपघात होणे

  • वाहन नादुरुस्त होऊन अपघात होणे

  • अति वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात

  • मद्य सेवन करून वाहन चालवल्यामुळे अपघात 


अपघात होऊ नये म्हणून परिवहन विभागाची खास मोहीम 


नागपूर आणि मुंबई दरम्यानचा समृद्धी महामार्ग हा सरळ महामार्ग आहे. पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यापासून गेल्या 40 दिवसात या महामार्गावर जवळपास 65 अपघात झाले. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 23 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग समृद्धी ऐवजी अपघातांची मालिका घेऊन आला की काय असं चित्र उभं राहिलं आणि त्यामुळे प्रशासनही हादरले आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि परिवहन विभाग हे अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. हे अपघात कशामुळे होतात त्याची कारणे काय यावरही आता चर्चा सुरू झाली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या बघता आणि त्याची कारणं बघता आता यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे, वाहन चालकांची जनजागृती करणे यावर परिवहन विभाग भर देत आहे. गेल्या 40 दिवसात या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या अघपातांची कारणे देखील वेगवेगळी आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबणार? परिवहन विभागाकडून खास मोहीम