Bhandara Rain : तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर माडगी येथील नरसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. राज्य आपत्ती दलामार्फत भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या नरसिंह मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक गेले होते. यावेळी नदीचे पाणी वाढल्यानं 15 भाविक मंदिरातच अडकले होते. अखेर 19 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 7 महिला तर 8 पुरुषांचा समावेश होता.


भंडारा- मध्य प्रदेश राज्य मार्गावरील वाहतूक सुरु


पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्यानं त्यांना बाहेर काढणे धोक्याचे होते. मात्र, अखेर राज्य आपत्ती दलामार्फत या भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तब्बल 18 तासानंतर भंडारा- मध्य प्रदेश राज्य मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मोहाडीजवळ नाला ओव्वह फ्लो झाल्यानं जिल्हा प्रशासनानं वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता. कालपर्यंत तब्बल 4 फुटावर पुलावरुन पाणी वाहत असल्यानं कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून प्रशासनाला नाईलाजास्तव हा निंर्णय घ्यावा लागला होता. मात्र आता 18 तासानंतर पुलावरील पाणी कमी झाल्यानं पहाटे 5 नंतर येथील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. सध्या वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. 




भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पावसानं मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं नदी नाल्यातून पावसाचे पाणी वैनगंगा नदीत येऊ लागल्यानं अचानक वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं मंदिराला पाण्याने वेढा दिला. त्यामुळं भाविक मंदिरातच अडकले होते. 


भंडारा जिल्ह्यात पावसानं कहरच केला आहे. रात्रभर पाऊस बरसल्यानं जिल्ह्यातील छोटे मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर भंडारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशला जाणारा मार्गही बंद झाला होता. भंडारा तुमसर मार्गांवरील मोहाडी येथील रस्त्यावरुन दोन फूट पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. भंडारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशला जोडणारा हा रस्ता पुर्णतः पाण्याखाली गेल्यानं अवजड वाहनधारकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. अखेर संथ गतीनं वाहतूक सुरु झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या: