बीड: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात त्याचे सातत्याने पडसाद उमटत आहेत. एकीकडे पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे बीड जिल्ह्यात (Beed) तणावाचे वातावरण आहे. त्याचवेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिरुर-कासारच्या वारणी गावातील गणेश बडे (Ganesh Bade) यानेही पंकजा मुंडे यांचा पराभव सहन न झाल्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. पंकजा मुंडे या रविवारी गणेश बडे याच्या अंत्यविधीवेळी वारणी गावात गेल्या होत्या. यावेळी गावातील वातावरण शोकाकुल आणि भावूक होते. पंकजा मुंडे यांनाही याठिकाणी प्रचंड रडू कोसळले. 


या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे. बीड जिल्ह्यात मनला सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत आपला नेता हरला म्हणून काही तरुणांनी आत्महत्या केल्या.पंकजा मुंडे या लोकसभेत हारल्या म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याच, पण पंकजा मुंडे यांचं राजकीय भविष्य काय, ही चिंताही या आत्महत्यांमागील एक कारण आहे. आत्महत्या केलेल्या तरुणांनी मुंडे परिवारावरून जीव ओवाळून टाकला, असेच म्हणावे लागेल,असे  प्रकाश महाजन यांनी म्हटले.


मी काल पंकजा मुंडे यांचा आक्रोश पाहू शकत नव्हतो: प्रकाश महाजन


मी काल पंकजा मुंडे यांचा आक्रोश पाहू आणि ऐकू शकत नव्हतो. मुंडे साहेब गेल्यानंतरही पंकजा मुंडे यांनी इतका आक्रोश केला नव्हता. त्यांनी फार संयम ठेवला होता, धीराने कठीण प्रसंगाला तोंड दिले होते. पण काल पंकजा मुंडे उन्मळून पडल्या, असे बोलावे लागेल. भाजप किंवा जनसंघाच्या इतिहासात एखाद्या नेत्याच्या पराभवामुळे कोणीही आत्महत्या केल्याचे ऐकण्यात आलेले नाही. मुंडे परिवारावर प्रेम करणाऱ्या या तरुणांनी आत्महत्या केलेली नाही, तर बलिदान दिलेले आहे. पण निवडणुका येतात आणि जातात, आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे तरुणांनी टोकाचा विचार करु नये. मी कार्यकर्त्यांचं प्रेम समजू शकतो पण त्यांनी संयम ठेवावा आणि संघर्षाला तयार व्हावे. बीड जिल्ह्यातील चार आणि अहमदपूर येथी एका तरुणाने मुंडे परिवाराच्या भवितव्यासाठी आणि पंकजांच्या काळीजपोटी बलिदन दिले, ते व्यर्थ जाणार नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.


आणखी वाचा


नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला