Pankaja Munde: लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी फोन फिरवला, म्हणाल्या, मी सरकारच्या धोरणावर नाराज
Maharashtra Politics: पंकजा मुंडे, छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी आरक्षणाची बाजू मांडली आहे. लक्ष्मण हाके यांचे जालन्यातील वडगोद्री येथील उपोषण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
बीड: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या प्राणांतिक उपोषण आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लगेचच लक्ष्मण हाके यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. फोनवरुन झालेल्या संभाषणात पंकजा मुंडे यांनी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
पंकजा मुंडे यांनी हाके यांच्याशी फोनवरुन बोलताना म्हटले की, मी सरकारच्या धोरणावर नाराज आहे. राज्याच्या प्रमुखांनी आंदोलनस्थळी येऊन तुम्हाला भेटायला हवं होतं. पण ते आले नाहीत, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्याचे समजते. याशिवाय, पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.
ट्रेंडिंग
पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.
ओबीसी आंदोलनाकडे ढुंकूनही न बघणं हा तमाम ओबीसींचा अपमान: विजय वडेट्टीवार
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे. पण प्रशासनाकडून या आंदोलनाची कालपर्यंत साधी दखलह घेण्यात आली नव्हती. आज महाराष्ट्रात 60% ओबीसी समाज असून त्यांच्या मागण्यांकडे ढूंकूनही न बघणे हा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाचा अपमान आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
आणखी वाचा