Dhananjay Munde Grand Welcome in Beed : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या वाट्याला कृषिमंत्रीपद आले आहे. कृषिमंत्री पद मिळताच धनंजय मुंडे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. बीड (Beed) जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने मुंडे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाच्या एक दिवस आधीच मंत्रीपद मिळाल्यावर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आल्याने धनंजय मुंडे 'ग्रँड वेलकम' करण्यात आले. त्यामुळे दीड-दोन टनाचे हार, आठ-दहा जेसीबीने 'ग्रँड वेलकम'  स्वीकारणाऱ्या धनंजय मुंडेंना कृषी पदाची जबाबदारी मिळाल्यावर मराठवाड्यात समाधानकारक पाऊस असल्याचे कळाले का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


कुठे जेसीबीने दोन टनाचे फुलांचे भलेमोठे हार, तर कुठे जेसीबीनेच फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी अन् सर्वत्र जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी डिजीटल बॅनर, असे 'ग्रँड वेलकम'चा कार्यक्रम पार पडला तो राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणाऱ्या बीड जिल्ह्यात. विशेष म्हणजे, या 'ग्रँड वेलकम'चे मानकरी राष्ट्रवादीचे मंत्री असलेले धनंजय मुंडे होते. राजकारणात आल्यावर मुंडेंची दुसऱ्या इनिंगची ही ग्रँड सुरुवात म्हणून समर्थकांनी असे अभूतपूर्व स्वागत केले आणि मुंडेंनी देखील ते स्वीकारले. 


पण 13 तारखेला 'ग्रँड वेलकम' स्वीकारणाऱ्या धनंजय मुंडेंना मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे 14 जुलैला आठवण झाली आणि त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला. बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही, त्यामुळे 15 जुलैला असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले. मग हाच निर्णय एकदिवस आधी का घेतला नसावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे 13 तारखेला त्यांना कृषिमंत्रीपद मिळाले नसले तरीही, ते राज्याचे मंत्री मात्र होते हे विशेष... 


मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर...


जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस झालाच नाही. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र अजूनही अनेक भागात अपेक्षित पाऊस झालेलं नाही. काही ठिकाणी पेरण्याच झाल्या नाही तर काठी ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागातील अनेक प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. तर काही प्रकल्पात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्याची देखील अशीच काही परिस्थिती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhananjay Munde : अपुऱ्या पावसानं शेतकरी संकटाच्या छायेत, वाढदिवस साजरा करणार नाही : धनंजय मुंडे