बीड : बीड जिल्हा परिषद भाजपच्या म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडणूक उद्या होणार आहे. पंकजा मुंडे यांना शह देऊन जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठीच धनंजय मुंडे हे काही वेळापूर्वीच मुंबईहून औरंगाबादला पोहोचले औरंगाबादमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एक बैठक होऊन उद्याच्या निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवली जाणार आहे.


जिल्हा परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने सदस्य सहलीवर नेले असले तरी त्यांची संख्या 25 आहे. सत्तास्थापनेसाठी 27 सदस्यांचा आकडा जुळणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या साथीशिवाय भाजपला हा आकडा जुळणे कठीण आहे. 53 सदस्यांमधून अध्यक्ष - उपाध्यक्षांची निवड करावयाची आहे. 27 सदस्य असलेल्यांना सत्ता स्थापन करता येणार आहे..

सध्या तरी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या आकडा 23 आहे. पण राष्ट्रवादी सोबत शिवसेना आल्यास चार सदस्य वाढतील विशेष म्हणजे भाजपमधले काही सदस्य हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्यानेच बीड जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी धनंजय मुंडे शर्तीचे प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला बंडाची किनार

बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक कायम राजकीय पक्षातील बंडानी गाजली आहे. अगदी गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना जिल्हा परिषदेत बहुमत काँग्रेसचे असतानाही पंडित अण्णा मुंडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते तर सुरेश धस हे उपाध्यक्ष झाले होते.

त्यानंतर भाजपमध्ये असलेल्या सुरेश धस यांनी बंड करून राष्ट्रवादीला मदत केली होती आणि धनंजय मुंडे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनवले होते. याच सुरेश धस यांनी अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून बंड करून भाजपला मदत केली होती आणि बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूर ठेवत भाजपला जवळ केले होते.

आता उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत शिवसेना राहणार का? हा प्रश्नच आहे. कारण राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर राज्यांमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा महा विकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीत उतरणार असे जाहीर करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे भाजपचे सदस्‍य राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते करत आहेत आणि यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मुंबईहून औरंगाबाद आले आहेत. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक होत आहे. जिथे उद्या होणार्‍या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवली जाणार आहे.

बंडाची मोठी किनार असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बंडाचे राजकारण पाहायला मिळणार का हे पाहणे मोठे आवश्यक ठरणार आहे.