Aurangabad News : सध्या राज्यात विजेची टंचाई भासत आहे. राज्यातील अनेक भागात भारनियमन सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहेत. ग्रामीण भागात रात्री बारा ते अडीच वाजेच्या दरम्यान भारनियमन करण्यात येत असल्यानं नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान,  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबादच्या बिडकीन येथील गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयात झोपो आंदोलन केले. बिडकीन येथील गावकऱ्यांनी चक्क रात्र महावितरण कार्यालयात काढली.


सध्या रात्रीचे भारनियमन सुरु आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही झोपो आंदोलन करत आहोत. दिवसभरात तुम्ही लोडशडींग करा, मात्र रात्रीचे अडीच तासाचे लोडशेडींग बंद करा. अन्यथा याचे परिणाम गंभीर होणार असल्याचा इशारा आंदोलक राजेंद्र चव्हाण यांनी दिला आहे. रात्रीचे लोडशेडींग बंद केले नाहीतर आज याठिकाणी सगळे पुरुष आले आहेत, उद्या याठिकाणी महिला येऊन आंदोलन करतील असेही यावेळी राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.




दरम्यान, आंदोलकांनी रात्रीचे भारनियमन बंद करावे यासाठी चक्क रात्रभर बिडकीनच्या महावितरण कार्यालयात आंदोलन केले. सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. वातावरणात उष्णता जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांना केली. दरम्यान, राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस पडत आहे तर दुसरीकडे उन्हाचा चटका वाढत आहे. यामुळे नागरिकांना अवकाळीचा फटका बसत असताना दुसरीकडे उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच राज्यात विजेची टंचाई निर्माण झाल्याने भारनियमन सुरु आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भारनियमन बंद करा अशी मागणी केली जात आहे. 




आज जे वीज संकट या देशात निर्माण झालंय, ते फक्त कोळशामुळं निर्माण झालं आहे. कोरोना संपला आणि सर्व जण कामाला लागले, त्यामुळं विजेची मागणी वाढली, सणासुदीचा काळ आणि तापमानात वाढ झालीय. त्यामुळं सुद्धा वीज संकट निर्माण झालं. मागणी आणि पुरवठयामध्ये तफावत निर्माण झालीय. तसेच राज्यातील काही ठिकाणीच भारनियमन करण्याचा आमचा मानस असल्याचे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. 1 ते दीड हजार मेगावॅटची तूट असताना विरोधक अतिरंजित करुन सांगत असल्याचे राऊत म्हणाले.