Aurangabad Water Issue: औरंगाबादच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबईतील अधिकारी प्रत्यक्ष तर मुंबई बाहेरील अधिकारी हे ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलीवर घेतले. मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. 


औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी आठ दिवसांतून एकदा पाणी येतं, त्यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर पाणी प्रश्नाने हैराण आहे. दरम्यान येत्या आठ तारखेला औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. काही दिवसापूर्वी भाजपाने पाणी प्रश्नावरून आक्रमक होत मोर्चा काढला होता. त्यामुळे शहारत सभेसाठी येणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी पाणी प्रश्न महत्वाचे आहे. त्यामुळेच औरंगाबादच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली असल्याची चर्चा आहे. 


काय म्हणाले मुख्यमंत्री... 


बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पाणीप्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देतांना, तंबीही दिली. 'मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 


तसेच, औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घेण्यात यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल,असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सोबतच या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.