Aurangabad News: नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून, औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पूरपरिस्थिती पाहता वांजरगावात बचाव पथक दाखल झाले असून, पाण्याची आवक वाढल्यास गावकऱ्यांना इतरत्र हलवण्याच्या निर्णय घेतला जावू शकतो. तसेच सरला बेटकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भाविकांना बेटवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 


प्रशासकीय अधिकारी पोहचले ट्रॅक्टरवरून...


गोदावरी नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका वैजापूर तालुक्याला बसतांना पाहायला मिळत आहे. नदी काठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती लक्षात घेत स्थानिक प्रशासनाचे अधिकारी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावात जाऊन स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहे. तर अनेक ठिकाणी जाण्यसाठी रस्ता नसल्याने त्याठिकाणी ट्रॅक्टरवरून जाऊन, अधिकारी लोकांपर्यंत पोहचत आहे. वैजापूर तालुक्याचे तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी के.टी.जाधव, पोलीस अधिकारी शरदचंद्र रोडगे यांनी ट्रॅक्टरवरून प्रवास करत गावांमध्ये जाऊन नागरिकांना सूचना केल्या. 


सराला बेटाजवळील शिंदे वस्तीला पुराचा वेढा


वांजरगावाजवळील आणि सराला बेटच्या परिसरात असलेल्या शिंदे वस्तीला पुराचा वेढा पडला आहे. गोदावरी नदीला पूर आल्यावर शिंदे वस्तीला पुराचा वेढा पडतोच. या वस्तीवर 45 कुटुंबातील 380 नागरिक वास्तव्यास आहेत. सोबतच 309 पाळीव जनावरे सुद्धा आहेत. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षितस्थळी रवाना होण्याची विनंती केली, मात्र सद्या वस्तीवरील घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने तेथील नागरिकांनी वस्तीवरच थांबण्याची भूमिका घेतली आहे. मात्र अचानकपणे पाण्याचा वेग वाढल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करून नागरिकांना बाहेर काढण्याची तयारी प्रशासनाची आहे. 


महत्वाच्या बातम्या 


Aurangabad: जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली; 35 गावांना सतर्कतेचा इशारा


Nashik Rain : जिल्ह्यात मागील 24 तासांत 1619 मिलीमीटर पाऊस, नाशिक शहरात पावसाची उघडीप