Aurangabad Crime News: एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दुसरीकडे औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील एका गावात आदिवासी अल्पवयीन मुलीवर येथील सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका विधिसंघर्ष मुलाचाही समावेश आहे. तर या घटनेने कन्नडसह औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शनिवारी (13 ऑगस्ट)  रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडिता घरी असताना सहा जणांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. विशेष म्हणजे यातील काही आरोपींकडून यापूर्वी सुद्धा पिडीत मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. मात्र घरीची परिस्थिती चांगली नसल्याने आणि आरोपींकडून मिळालेल्या धमकीमुळे पिडीताने याबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही. 


पीडितेच्या आईला धक्का बसला


आरोपींकडून नेहमीच अत्याचार होत असल्याने अखेर पिडीत मुलीने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याच आईला सांगितले. हे ऐकून पीडितेच्या आईला धक्का बसला. त्यांनी तत्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपीविरुद्ध तक्रार दिली. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना  न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत तर एका अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव करीत आहे.


हे आहेत आरोपी...


आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जनांना अटक केली आहे. ज्यात किरण साहेबराव गोंडे ( वय 32 वर्षे) व अरुण कैलास दरेकर (वय 31 वर्षे) या दोघांनी तिच्यावर जबरी बलात्कार केला. तसेच यापूर्वीही आरोपी किरण व अरुण यांच्यासह श्रीकांत अशोक जाधव ( वय 33 वर्षे), गोविंद नेमीनाथ शेळके (वय 29 वर्षे), संकेत जगन जाधव (वय 19 वर्षे) व एका विधिसंघर्ष बालकानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. 


मुलीची आई घरी नसल्याचा घेतला फायदा...


पीडित मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. तर पीडिता ही शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या आईबरोबर मोलमजुरीचे काम करते. अनेकदा आई कामाला गेल्यावर मुलगी घरी एकटीच असायची. त्यामुळे आरोपींनी याचा फायदा घेत पिडीत मुलीची आई घरी नसतांना तिच्यावर अत्याचार केला. नंतर पुढेही अनेकदा अशाप्रकारे मुलीवर सतत अत्याचार करण्यात आला आहे.