Aurangabad: राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने राजकीय चमत्कार करत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. मात्र निवडणुकीपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे अशी इच्छा व्यक्ती केली होती, त्या काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


काय म्हणाले होते जलील...


विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुणाला पाठींबा देणार यावर बोलताना जलील म्हणाले की, माझं वैयक्तिक मत जर विचारले तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचे काम चांगले आहे. मी त्यांना कधी भेटलो नाही, पण ज्यावेळी ते मंत्री होते तेव्हा त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या समाजासाठी खूप काम केले आहे. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा संधी मिळावी असे माझ वैयक्तिक मत असल्याचे जलील म्हणाले होते. मात्र हंडोरे यांचा विधानपरिषदेच्या निवडणूकीत पराभव झाला आहे.


काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव


पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार दिल्लीला जाणार आहेत. पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते आता दिल्लीत धाव घेण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींना भेटून पक्षातील या घडामोडी त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडीच्या शक्यता आहे.


महाविकास आघाडीत राहायचं का?


एकीकडे शिवसेनेत राजकीय भूकंप होण्याची चिन्हं असताना काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवानं प्रचंड नाराजी आहे. यापुढे  महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल, असं निर्वाणीचं वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी केलं आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.