Aurangabad Crime News: वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे सोमवारी सायंकाळी राहत्या घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पती व सासुला ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, महिलेच्या दिरानेच तिची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबध निर्माण झाले आणि यातून महिलेकडून सतत पैश्यांची मागणी होत असल्याने तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी दिराने दिली आहे. माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे. 


वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील माया आगलावे यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर आपल्या जावयाने आणि तिच्या आईनेच ही हत्या केली असल्याची माहिती माया यांच्या आईने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत, मायाच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेतले होते. तसेच माया यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास करत होते. 


पोलीस माया यांच्या हत्येचा तपास करत असतानाच त्यांना खबऱ्याकडून एक माहिती मिळाली आणि  पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवली. दरम्यान मृत माया आणि त्यांचा चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबध होते आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन, पोलीसा ठाण्यात आणले. 


खाक्या दाखवताच खुनाची कबुली...


पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी ज्ञानेश्वरची प्राथमिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या आणि ज्ञानेश्वर पोपटावानी बोलायला लागला. मायाचा खून आपणच केला असल्याची कबुली देखील त्याने दिली. आधी गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पाण्याची टाकीत फेकून दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली. 


पैश्यांची मागणी होत असल्याने घेतला जीव...


ज्ञानेश्वर नात्याने मायाचा चुलत दीर लागतो. त्यामुळे एकमेकांच्या घरात दोघांचे नेहमी येणेजाणे असायचे. यादरम्यान चार महिन्यापूर्वी दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबध निर्माण झाले. पण पुढे मायाकडून सतत पैश्यांची मागणी होत असल्याने ज्ञानेश्वर त्रस्त झाला होता. तर पैसे दिले नाहीतर बलात्काराचा आरोप करून समाजात बदनाम करण्याची धमकी देखील मायाकडून मिळत होती. दरम्यान सोमवारी 19 डिसेंबरला मायाने पुन्हा 20 हजारांची मागणी केली. पण पैसे नसल्याचे सांगून, देखील माया समजून घेत नव्हती. तसेच पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत असल्याने ज्ञानेश्वरने तिचा गळा आवळून हत्या केली.