Aurangabad Crime News: नाशिकच्या कंपनीतून कंटेनरमध्ये आणलेले 20 लाख रुपये किमितीच्या वेदेशी दारूचे 400 बॉक्स चक्क चालकानेच लंपास केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हा दाखल होताच अवघ्या 24 तासांत पोलिसांनी चोरी गेलेले दारूचे बॉक्स शोधून काढले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक इम्रान शेख (रा. जोगेश्वरी परिसर, वाळुज, औरंगाबाद) विरोधात गुन्हा दाखल केला असून, तो सद्या फरार आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कंटेनरचालक इम्रान शेख याने आपल्या ताब्यात असलेला अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचा मद्यासाठा गजानन महाराज मंदिर परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने लपवुन ठेवलेला आहे. तसेच आयशर ट्रक हा वाळूज येथे कामगार चौकात लावुन पसार झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने तात्काळ वाळूजच्या कामगार चौक परिसरात इम्रान सोडून गेलेला रिकामा ट्रक शोधून काढला. 


ट्रकला असलेल्या जीपीएसच्या आधारे पोलिसांनी तो कुठे-कुठे गेला होता याचा तपास सुरु केला. दरम्यान गजानन महाराज मंदिर परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरे तपासुन सदर ट्रक हा याल्ला-याल्ला हॉटेलच्या विरुध्द बाजुस असलेल्या विजयनगर, न्यायनगर परिसरात गेला असल्याचे दिसुन आले. त्यावरुन पोलीस पथकाने परिसर पिंजुन काढला. यावेळी आयशर मधील दारूचे बॉक्स कारटेक कंम्प्लीट कार सोल्युशन मागील विजयनगर या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवुन ठेवल्याचे आढळून आले. 


आरोपीचा शोध सुरु...


इम्रान शेख याने पत्र्याच्या शेडमध्ये लपवुन ठेवलेले दारूचे बॉक्स आणि आयशर ताब्यात घेऊन पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच जप्त आयशर व विदेशी मद्यसाठा हा गुन्हे शाखेकडून पोलीस ठाणे जवाहरनगर यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तर जवाहरनगर पोलिसांकडून फरार आरोपी इम्रान याचा शोध घेतला जात आहे. 


जीपीएस प्रणालीची भूमिका महत्वाची ठरली...


वाहनचोरीचे गुन्हयास प्रतिबंधक व्हावा तसेच सुरेक्षेच्या कारणाकरीता जीपीएस (GPS System) चा वापर करावा असे आवाहन औरंगाबाद शहर पोलीसांनी केला आहे. कारण या गुन्ह्यात सर्वाधिक महत्वाची भूमिका जीपीएस प्रणालीची ठरली आहे. आयशरमध्ये जीपीएस असल्यानेचं चोरीला गेलेला मुद्देमाल आणि आयशर शोधण्यासाठी पोलिसांना मोठी मदत झाली आहे.


महत्वाच्या बातम्या...


मोठी बातमी: औरंगाबादच्या लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये गोंधळ, शेतकऱ्यांकडून मुंबई-नागपूर महामार्गावर रास्ता रोको


Aurangabad Crime: आधी तरुणाला संपवलं, त्यानंतर हातपाय बांधून विहिरीत फेकलं; परिसरात खळबळ