मराठवाडा पाणीप्रश्न : औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 02 Feb 2020 04:39 PM (IST)
मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबाद येथे बोलवण्यात आलेल्या बैठकीला अनेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. यावरुन पाणी प्रश्नी लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी केल्याय.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासंदर्भाल लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी आमदारांना जाब विचारलाय. औरंगाबादेत मराठवाड्यातील आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकील फक्त नऊ आमदार उपस्थित होते. यामुळं मराठवाड्याच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचा आरोप विद्यार्थी आणि महिलांनी केलाय. यावेळी आमदार प्रशांत बंब यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबाद इथल्या हॉटेल अजिंठा आंबे सिटरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. मराठवाड्यातल्या 55 आमदारांपैकी या बैठकीला केवळ 10 आमदार उपस्थित होते. यातील नऊ आमदार भाजपचे तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. तर काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळेच या बैठकीत विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त महिला आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरलं. केवळ आमदरच नाही, तर मराठवाड्यातल्या 9 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित नव्हता. बैठकीला दांडी मारणारे लोकप्रतिनिधी - मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील, परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे अनुपस्थित होते. याशिवाय जे मंत्री दोनदा-तीनदा आमदार झालेत, त्यातील अनेक आमदार उपस्थित नव्हते. जलयुक्त शिवार योजना बंद करू नका; देवेंद्र फडणवीसांचं सरकारला आवाहनबैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधी - बैठकीला संयोजक भाजपचे आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेश पवार, रामराव पाटील रातोळीकर हे भाजपचे नऊ आमदार, तर शिवसेनेचे एकमेव संजय शिरसाठ असे एकूण 10 आमदार बैठकीला उपस्थित होते. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीच मोठा अडथळा; गडकरींचा गंभीर आरोपमराठवाड्यातला पाणीप्रश्न गंभीर - मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा, टँकरवाडा अशी विशेषणे लागली आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे. यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्नी तरतूद करण्याची सरकारला विनंती केली जाणार असल्याचं या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितले. Water Grid Project | काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प? | ABP Majha