औरंगाबाद : नागरिकांना गंडा घालणाऱ्या 'बंटी और बबली'च्या गँग्ज आता आपल्यासाठी नवीन नाही. औरंगाबादेत लुटारु बहीण-भावाच्या जोडीने धुमाकूळ घातला आहे. बँकेतून मोठी रक्कम घेऊन बाहेर पडलेल्या ग्राहकांची पाच मिनिटांत लूटमार करणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत.


बँकेतून मोठी रक्कम काढताना सावध राहण्याचं आवाहन पोलिस नेहमीच करतात. याचा पुनरुच्चार करण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये बहीण-भावाच्या जोडीने राज्यातील अनेकांची झोप उडवली होती. अखेर, 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' विनय राणा आणि पुष्पा परेरा पोलिसांच्या तावडीत सापडले.

स्थानिकांना लूटण्याची अनोखी स्टाईल त्यांनी अवलंबली होती. सुरुवातीला राज्यातील एखादं शहर निवडायचं. त्यानंतर शहरातील बँकांबाहेर दबा धरुन बसायचं. एखादी व्यक्ती मोठी बॅग किंवा मोठी गाडी घेऊन बँकेत आली, तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं, अशी त्यांची मोडस ऑपरेंडी.

बँकेतून बाहेर पडल्यावर त्या व्यक्तीचा पाठलाग करायचा आणि वाटेत कुठेही ती व्यक्ती थांबली, की अवघ्या पाच मिनिटांत गाडीतून रक्कम घेऊन पसार व्हायचं. या जोडगोळीनं औरंगाबादमध्येही एका व्यवसायिकाची 30 लाखांची रोकड अशीच पळवली.

तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या बहीण-भावाने केला. मात्र, त्याचाच योग्य वापर करुन पोलिसांनी त्यांना अटक केली. फक्त औरंगाबादच नाही तर नाशकातही या जोडीला पोलिसांनी एकदा अटक केली होती. मात्र तरीही त्यांचे प्रताप सुरुच आहेत.

आता तरी त्यांच्यावर कडक कारवाई होईल का, याचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल. मात्र तोपर्यंत बँकेतून मोठी रक्कम काढताना काळजी घ्या.