यवतमाळ:  कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर फवारणी पंपाने औषध फवारण्याचा प्रयत्न झाला. यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या सदाभाऊंना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.


याप्रकरणी सिकंदर शाह या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

फवारणी करताना विदर्भात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारी अनास्थेमुळे मंत्र्यांविरोधात रोष वाढत आहे.

फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन 19 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर 546 शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एबीपी माझाने याबाबत सर्वप्रथम वृत्त देऊन पाठपुरावा केला.

कपाशी आणि सोयाबीनवर पावसाचा मोठा खंड पडल्याने किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी जहाल कीटकनाशके पिकांवर फवारणी करत आहेत. मात्र फवारणी करताना शेतकरी योग्य ती काळजी घेत नसल्याने विषबाधा होत आहे.

दरम्यान जखमी आणि मृत शेतकऱ्यांची ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे

फवारणी करताना काय काळजी घ्याल?

फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो.

शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

संबंधित बातम्या

कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?

फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत!


फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर