अहिल्यानगर : राहुरीत अक्षय कर्डीले (Akshay kardile) यांच्यासाठी आयोजित सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही परीक्षार्थी उमेदवारांनी बॅनर दाखवले असून देवाभाऊ न्याय द्या, अशा आशयाचे बॅनर झळकवल्याने राहुरीतील सभेत याचीच चर्चा रंगली. स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांनी हे बॅनर दाखवले असून भरती रखडल्याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर, तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. दरम्यान, तत्पूर्वी सभेत माजी खासदार सुजय विखे यांनीही तुमच्या प्रश्नासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वेळ देतील असे म्हटले होते. 

Continues below advertisement

मला तुमची पद्धत आवडली, लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडून, तुम्ही शांतपणे बसलात. मी तुमचे अभिनंदन करतो. तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया भाषणादरम्यान मुख्यमंत्र्‍यांनी आंदोलकांना उद्देशून दिली. तसेच, शिवाजीराव कर्डीले यांच्या आठवणी जागवत अक्षयला विधानसभेत पाठवण्याची विनंती राहुरीकरांना केली. 

ही पोट निवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता, शिवाजीराव कर्डीले यांच्याबाबत आपल्या प्रत्येकाजवळ काही न काही आठवणी आहेत. शिवाजीराव कर्डीले यांच्या ठायी जनतेचा विषय असायचा, शिवाजीराव हे अतिशय धोरणी राजकारणी होते. कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते. कर्डीले साहेबांनी मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावरही आराम केला नाही. जनतेची सेवा करत करत त्यांनी शरीराचा ऱ्हास करून घेतला. या अडचणीच्या काळातही ते डगमगले नाही, त्यांचे जाण्याचे वय नव्हते, पुढे मोठे राजकीय कारकीर्द होती. ते भेटले की नेहमी ते निळवंडे प्रश्न आणि, वांबोरी चारीबाबत बोलायचे. आता, वांबोरी चारीसाठी 125 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशा आठवणी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितले.

Continues below advertisement

समुद्रात वाहून जाणार 75 टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम भागात आणण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सर्वच धरणातील गाळ काढून पाणी साठा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाजीराव कर्डीले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर आम्ही करू, आमच्याकडून एखादं काम शिवाजीराव कर्डीले यांचे करायचे राहिले असेल पण अक्षयची सर्व कामे आम्ही पूर्ण करू हे सांगायला आम्ही आलोय, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुरीकरांना अक्षयच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

संग्राम जगताप, सुजय विखे यांनी या निवडणुकीची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे हातात घेतली आहे. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत हे शिवाजीराव कर्डीले यांना दिलेली श्रद्धांजली असेल. कृषी विद्यापीठातील अधिकचीजी जागा आहे, त्यातील एक हजार एकर जागा आपल्याला एमआयडीसीसाठी देता येईल. राहुरी एमआयडीसीचे पुर्नजीवन करायचे आहे, अक्षय कर्डिलेला मी राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जात आहे, असे म्हणत राहुरीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिले.

प्राजक्त तनपुरेंचेही मानले आभार

मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला, त्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्याला सातत्याने लोक हिताचे काम करायचे आहे ते केले जातील. खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी कर्जमाफी अस्तित्वात आणणार आहोत, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना भविष्यातही मोफत वीज दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.

अक्षय कर्डीले भावूक, बहिणीच्या डोळ्यातही अश्रू

राहुर पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना वडिलांच्या आठवणीने अक्षय कर्डिले भावूक झाल्याचं दिसून आलं, तर अक्षय यांच्या भाषणावेळी त्यांच्या पत्नी आणि बहिणीच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. मतदारसंघातील सर्व लोक माझ्यामागे भक्कमपणे उभे आहेत. माझं दुर्भाग्य आहे की, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत असताना माझे वडील माझ्यासोबत नाहीत, असे म्हणताना अक्षय कर्डिले भावूक झाले होते.

हेही वाचा

साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता, शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?