अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Ram Shinde) यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेवर (Yuva Sangharsha Yatra) भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार यांनी काढलेली यात्रा ही कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये आहे, मात्र हे कंत्राटी भरतीचे जीआर नेमके कोणत्या सरकारच्या कार्यकाळात काढले हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. त्यांच्याच कार्यकाळामध्ये असे जीआर काढण्यात आले होते. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात असं राम शिंदे यांनी म्हटलं. 


आमदार राम शिंदे म्हणाले की, हे कंत्राटी भरतीचे जीआर महायुतीच्या सरकारने मागे घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला अर्थच उरत नाही. मात्र काही लोकांना स्वप्नं पडली आहेत. ही स्वप्नं मुंगेरीलाल के हसीन सपने ठरणार आहेत. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी परिस्थिती रोहित पवार यांची झाली आहे. 


रोहित पवारांची संघर्ष यात्रा सुरू


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. एकूण 45 दिवसांचा हा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर असा प्रवास करणार आहे. युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.


युवा संघर्ष यात्रा कशासाठी..?
- कंत्राटी नोकरभरती रद्द करण्यासाठी.
- 2 लाख 50 हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी.
- अवाजवी परीक्षा शुल्क रद्द करण्यासाठी.
- जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी.
- सक्षम आणि कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी करण्यात यावी, या मागणीसाठी.
- क्रीडा विभागाचं सक्षमीकरण व्हावे, या मागणीसाठी.
- होतकरू खेळाडूंना संधी मिळावी, या मागणीसाठी. 
- पेपरफुटी विरोधात कायदा यासाठी.
- शाळा दत्तक योजना रद्द करण्यासाठी.
- बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी यासाठी
- नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मिळावी यासाठी. 
- समुह शाळा योजना रद्द करण्यासाठी.
- रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात यासाठी
- महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणण्यासाठी.
- सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI संस्थाचे सक्षमीकरण होण्यासाठी.
- नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखण्यात यावा, या मागणीसाठी.
- TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद मिळालीच पाहिजे.
- सर्व भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात यावी या मागणीसाठी.
- प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी या मागणीसाठी.
- शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत या मागणीसाठी.
- असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी Reskilling, Up Skilling देण्यात यावे, या मागणीसाठी.
- युवा आयोगाची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी.
- विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह मिळालेच पाहिजे.
- महिलांची सायबर सुरक्षा सक्षमपणे राबिविण्यासाठी.
- तालुका स्तरावर MIDC ची स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC च्या सक्षमीकरणासाठी,
- अमरावती या Two Tier शहरांमध्ये IT क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आणण्यात यावे या मागणीसाठी.
- ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाईला वाचविण्यासाठी.


ही बातमी वाचा :