Maharashtra News : राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर (Sangamner) शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांच्या भाषणाने सर्वांची दाद मिळवली. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात थोरात दाम्पत्य स्वतःच्या लग्नाच्या गप्पात रमल्याचं पाहायला मिळालं.


थोरात दाम्पत्याच्या लग्नातील गंमतीदार किस्से


काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचं आयोजन देखील वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरात करण्यात आलं. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री झालेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात थोरात आणि तांबे कुटुंबीयांबरोबर पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. 


भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील निवासस्थानी भेट देत बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निवासस्थानासमोर झालेल्या या सोहळ्यात बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना बाळासाहेबांचा स्वभावच उपस्थितांसमोर मांडला.


कांचन थोरात नेमकं काय म्हणाल्या?


कांचन थोरात यांनी यावेळी म्हटलं की, ''साहेब आता 70 वर्षांचे होताय.. मी त्यांच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान. साहेब जेव्हा मला पाहायला आले, तेव्हा मी त्यांचे पाय पाहूनच त्यांना पसंत केले. त्यांनी माझा चेहरा पाहिला असेल, मात्र मी फक्त पायच पाहू शकले. आमचा योगायोग होता म्हणून लग्न जमलं. लग्नानंतर 20 वर्ष कधी पिक्चर आणि नाटकाला सुद्धा नेलं नाही. रोज फक्त पावणेरावळे हेच करत आले. साहेबांनी मला अमेरिका, दुबई खूप फिरवलं मात्र ते 30 वर्षानंतर. साहेबांना वेळच नव्हता.''


थोरांताच्या पत्नीची मिश्लिल टिपण्णी 


''रोज राजकारण त्या लोकांचे असंच. घरात आले की, चेहरा पडलेला दिसायचा मात्र कार्यकर्ते आले की लगेच जायचे आणि दीड दोन तास बोलत बसायचे. फक्त आपल्या समोर आले की, मी थकलो, झोप येते, हे सुरू व्हायचं. मी जे बोलतेय, ते मनातलं, पाठांतर केलेले नाही. मला कुटुंबाने खूप साथ दिली. नंतर मी मैत्रिणीचा ग्रुप बनवला, त्यांनी खूप साथ दिली, त्यामुळे आता काय मला ही साहेबांची आठवण येत नाही.'' असं म्हणत थोरांताच्या पत्नीने मिश्लिल टिपण्णी करत त्यांना क्लिन बोल्ड केलं.


बाळासाहेब थोरातांनीही मनोगत केलं व्यक्त


माझं राजकरण काम सगळ्यांना माहीत.. मात्र सौभाग्यवती कांचनने अनेक किस्से सांगितले.. मी आधी जोर्वे गावात राहायचो.. वडील आमदार असताना मी वकील झालो.. त्यावेळी लग्नाचा विषय आला.. मी विचार केला की आपल्याकडे रोजच इतके पाहुणे कार्यकर्ते येतात.. इथ टिकलं कोण हाच मा तेव्हा प्रश्न..मी महाविद्यालयात असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले. एका व्यापाऱ्याने त्यावेळी सांगितल की चांगला मुलगा आहे.. वकील आहे गोरा गोमटा आहे.. मी कांचनला पाहायला गेलो..तिथे त्यांचं घर व मोठ कुटुंब सदस्य पाहूनच ठरवलं हे आपल्याकडे बरोबर जमेल.. कोण चालेल आपल्या घरी ही दूरदृष्टी आणि अचूक निर्णय माझा ठरला..त्यामुळे कटकट नावाचा प्रकार आजपर्यंत नाही.. तुमचं तुम्हाला माहीत.. अनेकांच्या घरात रोज सुरूच असत. नवरा बिचारा काम करून येतो..आणि घरी आले का बायको म्हणते आले का फिरून..तो दमून आलेला असतो आणि असा प्रश्न येतो जसा तो बागेत फिरायला गेलेला असतो.. असा काही त्रास मला नाही.. माझा निर्णय बिनचूक ठरला हे आज कळत..