अहमदनगर : मांजराला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या (Biogas) खड्ड्यामध्ये पडलेल्या पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला  आहे.  बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. विहिरीतील विषारी वायूने गुदमरून पाच जणांचा मृत्यू  आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 


नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सुमारास तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजर पडलं आणि त्याला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरला.  मात्र त्याला बाहेर यता येत नसल्यानं एका मागे सहाजण एकमेकांना वाचवण्यासाठी त्या खड्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने  अडथळे येत होते.  परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने एकाला लवकर बाहेर काढण्यात आलं मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला.


पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश


या खड्ड्यात पडलेले सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली असून नेमका हा सगळा प्रकार कसा घडला हे तपासानंतर समोर येईल. माणिक गोविंद काळे,  संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. काल रात्री चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एकाला वाचवण्यात यश आले. आपात्कालीन यंत्रणा नसल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अखेर पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.


नेमकं प्रकरण काय?


बायोगॅसच्या या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता.मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 4 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले. 


हे ही वाचा :


गुढीपाडव्याच्या दिवशी विरारमध्ये दुर्दैवी घटना, एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू