नागपूर : ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आदित्य ठाकरे विधानसभेत आज पहिल्यांदा भाषण केलं. चिखलात कमळ उगवतं म्हणून प्रत्येकवेळी महाराष्ट्रात असं घडणार नाही तसच आता चिखल केलेलाही चालणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. विधानसभेमध्ये पहिल्यांदाच बोलताना आदित्य ठाकरे यांनी हवामान बदल आणि पर्यावरण या विषयांवर बोललेच पाहिजे असा आग्रह देखील धरला. पर्यावरणात होणाऱ्या बदलाचा शेतीवर होणारा परिणाम यावरही विशेष चर्चा घेण्याची मागणी केली. या भाषणात त्यांनी भाजपवर शांतपणे शेलक्या शब्दात ताशेरे देखील ओढले. 'सामना'वरुन झालेल्या गोंधळाबाबत बोलताना ते म्हणाले की, अगोदरच सामना वाचला असता तर ते आमच्यासोबत या ठिकाणी असते.


राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा असले प्रकार होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायचं, ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी नोटबंदीच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. केजी टू पीजी शिक्षण बदलण्याची गरज आहे. त्यात नोकरीचीही हमी हवी, डिजिटल एज्युकेशन हे गाव पातळीवर न्यावं लागेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा -  शिवसेनेकडून जीवाला धोका, किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र

वरळी विधानसभा मतदारसंघात अगदीच एकतर्फी झालेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे जिंकून आले. त्यानंतर भाजपसोबतची तुटलेली युती, राज्यपालांच्या भेटी, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेली महाराष्ट्र विकास आघाडी या सर्व राजकीय घडामोडींमध्ये आदित्य ठाकरे यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यामुळे विधानसभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.