RRR Movie Review : नुकत्याच रिलीज झालेल्या आरआरआर या सिनेमाबद्दल अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर मास्टरक्लास बाहुबली सिनेमानंतर राजामौळी काय करु शकतात तर आरआरआर करु शकतात असं ठासून सांगणारी ही कलाकृती आहे. कल्पनेपलिकडचं भव्य दिव्य विश्व उभं करणं ही दिग्दर्शक राजामौळींची खासियत आहे. हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. अर्थात कथेला स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातील वास्तवाचा स्पर्श असला तरी त्याला दिलेली ट्रीटमेंट आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. याचं जितकं श्रेय राजामौळींच्या दिग्दर्शनाला द्यायला हवं तितकंच साबु सिरील यांच्या प्रॉडक्शन डिझाईनलाही द्यायला हवं. ज्या कल्पकतेने त्यांनी माहिश्मती साम्राज्य उभारलं होतं त्याच ताकदीनं स्वातंत्र्यपूर्व भारत त्यांनी साकारलाय. त्यावेळचं गावं, मंदिरं, रस्ते, ब्रिटिशकालीन भव्य-दिव्य वास्तू हे सारंच कुठेही सेट वाटू नये इतक्या नजाकतीनं उभं केलय अर्थात व्हिएफएक्स टीमचाही त्यात मोठा वाटा आहे हे विसरुन चालता येणार नाही. 


या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद आहे ती यातली अॅक्शन. निक पॉवेलने कोरिओग्राफ केलेली यातले अॅक्शन सिक्वेन्स तुम्हाला अक्षरश: खिळवून ठेवतात. बाहुबलीमधलं युद्ध कमाल होतं पण यातले काही सीन्स त्याच्याही पुढचे आहेत. आणि अॅक्शन डिरेक्टरचं यश याच्यात आहे की तो समोर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडतो. भलेही रामचरण हजारोंच्या जमावाशी एकटा लढत असेल तरीही ते अशा पद्धतीने चित्रित केलंय की आपण कन्व्हिन्स होतो. सिनेमाची दुसरी जमेची बाजू अर्थातच गोष्ट. बाहुबलीकार के व्ही विजयप्रसाद यांनीच लिहिलेली ही गोष्ट आहे. गोष्टीचा जीव छोटा असला म्हणजे मोजून चार पाच वाक्यात सांगता येणारी असली तरी राजामौळींसारखा दिग्दर्शक असल्यानं त्याचं रुपांतर महाकाव्यात  झालंय.  


ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण या दोघांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. त्यांची  प्रतिभा  त्यांनी याआधीही सिद्ध केलीय. आरआरआरमुळे त्याला सोन्याचं कोंदण प्राप्त झालय.  जिथं सिनेमाचा  मध्यांतर होतो ती एकमेकांविरुद्धची लढाई आणि जिथं सिनेमा संपतो ती एकमेकांसाठीची लढाई अक्षरश: व्हिज्युअल ट्रीट आहे. आणि त्याचा अनुभव मोठ्या पडद्यावरच घ्यायला हवा. नाचो गाण्यातली त्यांची केमिस्ट्री तर थिएटर दणाणून सोडते. राजामौळींनी अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की ज्यु. एनटीआर आणि रामचरण या दोघांच्याही भूमिका तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि ते खरंही आहे पण तरीही रामचरणच्या भूमिकेला ज्या काही  शेड्स आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला वाटणारा खलनायक ते अगदी थेट रामाच्या अवतारात धनुष्य घेऊन मैदानात उतरणारा योद्धा ते सारं पाहता रामचरण या सिनेमात उजवा ठरतो हे मान्य करावंच लागेल. 


अजय देवगण आणि आलिया भट या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जेवढे दिसले होते त्याच प्रमाणात पूर्ण सिनेमात दिसतात. म्हणजे ना के बराबर. त्यांचं या सिनेमात असणं फक्त आणि फक्त बॉलिवुडच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी खेळलेला डाव आहे का असा प्रश्न उपस्थित करणारं आहे.  


सिनेमाच्या कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ही गोष्ट आहे साधारण 1920 च्या आसपासची. जेव्हा ब्रिटिश भारतीयांना अगदी पिळून काढत होते. अदिलाबादच्या जंगलात राहणारे आदिवासीही याला अपवाद नव्हते. याच जमातीतील एका लहानग्या मुलीला ब्रिटिश अधिकारी उचलून नेतात. त्या मुलीला सोडवून आणण्याची जबाबदारी भीम म्हणजेच ज्युनिअर एनटीआर उचलतो तर भीमला पकडण्याची शपथ  ब्रिटिशांच्या सेवेत असलेला शिपाई राम अर्थात रामचरण घेतो. त्यानंतर काय होतं ते म्हणजे हा सिनेमा. 


आता या सिनेमातल्या ज्या गोष्टी खटकल्या त्याबद्दल बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगेन ते अॅक्शनबद्दल. म्हणजे जी अॅक्शन या सिनेमाला तारते, मोठं करते तिच अॅक्शन  अतिरेकामुळे आपल्याला सिनेमापासून दूर घेऊन जाते. तो अतिरेक टाळता आला असता तर महत्वाचे अॅक्शन सीन्स आणखी खुलून आले असते. कदाचित अॅक्शनच्या याच मोहापायी सिनेमा थोडासा पसरट झालाय. बॅकग्राऊंड म्युझिक कमाल आहे मात्र नाचो हे गाणं सोडता बाकीची गाणी तेवढा प्रभाव पाडत नाहीत. अजय देवगण, आलिया भट सारखे स्टार चेहरे जवळपास वाया गेलेत. 


अशा छोट्या मोठ्या खटकणाऱ्या गोष्टी सांगता येणाऱ्या असल्या तरी आर आर आर हा एक मोठ्या पडद्यावर घेण्यासारखा अनुभव आहे. त्यामुळे जर तुम्हाला बाहुबलीने वेड लावलं असेल तर हाही सिनेमा तुमचं नक्की मनोरंजन करेल यात शंका नाही. राजामौळींच्या या अॅक्शन ट्रीटला मी देतोय साडेतीन स्टार्स.