Movie Review Samrat Prithviraj : ऐतिहासिक चित्रपट तयार करणे सोपे नसते. याचे कारण म्हणजे इतिहासाचे लिखाण वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केलेले असते. आणि त्यामुळेच खरा इतिहास पडद्यावर येणे थोडे कठिणच असते. आणि पडद्यावर मांडलेला तो इतिहास सगळ्यांनाच आवडेल असेही नसते. असे असले तरी अनेक निर्माते-दिग्दर्शक ऐतिहासिक वीरांवर चित्रपट तयार करतात.


चांद बरदाई यांनी ‘पृथ्वीराज रासो’ नावाचं एक महाकाव्य लिहिलेलं आहे. या महाकाव्यात बाराव्या शतकातील सम्राट पृथ्वीराज चौहान यांची वीरगाथा वीररसात मांडण्यात आलेली आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान हे शेवटचे हिंदू राजा होते आणि त्यांच्यानंतर देशात मुघलांचं राज्य सुरु झाले असे म्हटले जाते. अजमेरचे राजे असलेल्या पृथ्वीराज चौहान आणि भारतावर सतत आक्रमण करणाऱ्या मुहम्मद घोरीची लढाई दाखवण्यात आलेली आहे.


तारेन येथे पृथ्वीराज चौहान आणि मुहम्मद घोरोची पहिली लढाई झाली. या लढाईत पृथ्वीराज चौहान मुहम्मद घोरीचा पराभव करतात आणि त्यांना अटक करतात. परंतु नंतर त्यांना सोडून देतात. मुहम्मद घोरीला पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करायचाच असतो. त्यातच राजा जयचंद त्याची वेगळ्या कारणासाठी पृथ्वीराज चौहान यांच्याशी लढाई करण्यासाठी प्रेरित करतो. पुन्हा एकदा तारेन इथे लढाई होते. या लढाईतही पृथ्वीराज चौहान यांचा विजय होणार असतो. पण कूट नीतीने मुहम्मद घोरी रात्रीच्या काळोखात पृथ्वीराज चौहान यांच्या झोपलेल्या सैनिकांवर हल्ला करतो आणि त्यात पृथ्वीराज चौहान यांना कैद करतो. कैद केल्यानंतर तो पृथ्वीराज चौहान यांचे डोळे फोडतो. पण शब्दवेधी पृथ्वीराज चौहान मुहम्मद घोरीला लढाईचे आमंत्रण देतो. मुहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्या लढाईसोबतच पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्या प्रेमकथाही चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे.


अक्षयकुमारने प्रथमच ऐतिहासिक भूमिका साकारलीय. पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेला त्याने पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे यात शंका नाही. चित्रपटाच्या क्लायमॅक्सला त्याचा अभिनय खरोखरच चांगला आहे. संयोगिताच्या भूमिकेत नवोदित अभिनेत्री मानुषी छिल्लरने काही विशेष चमक दाखवली आहे असे नाही. नायिकेची भूमिका ती पार पाडते एवढेच. सोनू सूदने ज्योतिषी, कवी आणि पृथ्वीराज चौहान यांना शेवटपर्यंत साथ देणाऱ्या चांद बरदाईची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली आहे. मानव वीज ने मोहम्मद घोरीची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारलीय. तर संजय दत्तने काका कान्हाच्या छोट्याशा भूमिकेत जान ओतलीयय. मनोज जोशी, आशुतोष राणा, साक्षी तंवर यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका योग्यरित्या साकारल्यात.


पृथ्वीराज चौहान यांचा शेवट कसा झाला याच्या अनेक कथा आहेत. दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चांद बरदाई यांच्या महाकाव्यानुसार चित्रपटाचा शेवट केलेला आहे. डॉ. द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा आणि पराक्रम पडद्यावर मांडण्याचे शिवधनुष्य उत्कृष्टरित्या पेललेले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. चित्रपटाचे कथा-संवादही डॉ. द्विवेदी यांचेच आहे. काही संवाद खूपच चांगले असून महिलांना समान संधी देण्याबाबतही चित्रपटात भाष्य करण्यात आलेले आहे.


अशा चित्रपटांमध्ये खरे तर गीत-संगीताची आवश्यकता नसते. पण हिंदी चित्रपट असल्याने आणि बाजाराची मागणी असल्याने चित्रपटात गीते आहे. त्याला अनेकांनी हातभार लावलेला आहे. चित्रपटाचे शीर्षक गीत चांगले आहे. पण शेवटचे मैं यौद्धा बनी गाण्याची आवश्यकता नव्हती. गाणी अडचणीची वाटतात. आरिफ शेख यांनी चित्रपटाचे एडिटिंग खूप चांगले केलेले आहे. जय कुमार यांनी उत्कृष्ट सेट तयार केलेला आहे.


निर्माता आदित्य चोप्रा यांनी चित्रपटाच्या निर्मितीत कुठेही हात आखडता घेतल्याचे दिसत नाही. त्याबद्दल त्यांचे आणि यशराजचे अभिनंदन. एकूणच सम्राट पृथ्वीराज चौहान यांची ही शौर्यगाथा पाहण्यासारखी आहे.